अपघाताच्या प्रमाणात चिंताजनक वाढ झाली असून गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात अनेक भीषण अपघाताच्या घटना घडत आहेत. दरम्यान आता अशीच एक भीषण अपघाताची बातमी समोर येत आहे.
सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्याजवळ एक भीषण अपघात घडला असून रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीमध्ये पिकअप कोसळून हा अपघात घडला आहे.
पिकअप विहिरीत कोसळल्याने आठ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून संपूर्ण जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पंढरपूर–म्हसवड महामार्गालगत असलेल्या विहिरीत प्रवाशांनी भरलेली पिकअपअचानक कोसळली. अपघातावेळी वाहनामध्ये सुमारे 15 जण प्रवास करत होते.
या दुर्घटनेत आठ जणांना आपला जीव गमवावा लागला, तर सात जणांना स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने मदतकार्य करत सुखरूप बाहेर काढले. ग्रामस्थांच्या तत्परतेमुळे सात जणांचे प्राण वाचल्याचे सांगितले जात आहे.
ही हृदयद्रावक घटना तांदुळवाडी गावाजवळ घडली असून, अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनाची पथके घटनास्थळी दाखल झाली. मृतांची ओळख पटवण्याचे आणि अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे.
दरम्यान, या भीषण दुर्घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. प्रशासनाकडून पुढील तपास सुरू आहे.