दादर बेस्ट बस अपघाताविषयी RTO ने मोठा आणि धक्कादायक खुलासा केला आहे. या अहवालानुसार बसचे ब्रेक फेल नव्हते असा खुलासा समोर आला आहे. मुंबईतील दादर परिसरात काही दिवसांपूर्वी हा भीषण अपघात झाला होता. दरम्यान, या अपघाताचे कारण म्हणून बस चालकाने ब्रेक निकामी झाल्यामुळे बसवरील नियंत्रण सुटल्याचा दावा केला होता. मात्र, ताडदेव प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (RTO) प्राथमिक तपास अहवालात हा दावा चुकीचा असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
प्राथमिक तपासानुसार, हा अपघात मानवी चुकीमुळे घडला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. समोर अचानक वाहन आल्याने चालक घाबरला आणि ब्रेक दाबण्याऐवजी चुकून ॲक्सिलेटर दाबला गेला असावा, अशी शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. आरटीओने अपघातग्रस्त इलेक्ट्रिक बसची सविस्तर तांत्रिक तपासणी केली. या तपासणीत बसची मुख्य हायड्रॉलिक ब्रेक यंत्रणा, इलेक्ट्रॉनिक ब्रेक प्रणाली तसेच इमर्जन्सी हँडब्रेक पूर्णपणे कार्यरत आणि सुस्थितीत असल्याचे आढळून आले. त्यामुळे तांत्रिक बिघाडामुळे अपघात झाल्याचा दावा फेटाळण्यात आला आहे.
या भीषण अपघातात बसच्या समोरील भागाचे आणि अंतर्गत वायरिंगचे मोठे नुकसान झाले होते. मात्र, हे नुकसान अपघाताच्या धडकेमुळे झाले असून, अपघातापूर्वी कोणताही गंभीर तांत्रिक बिघाड नव्हता, असे आरटीओच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, मुंबई पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, चालकाविरोधात निष्काळजीपणा आणि सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलिसांचा अंतिम अहवाल प्राप्त झाल्यानंतर आरटीओकडून चालकाचा वाहन परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.या अहवालामुळे अपघाताच्या तपासाला नवे वळण मिळाले असून, चालकाच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.