मुलीच्या साखरपुड्याआधीच आई प्रियकरासोबत फरार !
मुलीच्या साखरपुड्याआधीच आई प्रियकरासोबत फरार !
img
Nandini khandare More


आजकाल कुठे काय घडेल याचा काही नेमच नाही. विवाहबाह्य संबंधांचे अनेक प्रकार आजकाल घडत असून आता अशीच एक घटना समोर आली आहे. आपल्या मुलीचा साखरपुडा म्हणजे एका आईच्या आयुष्यातील सर्वात मोठा आणि आनंदाचा क्षण असतो आणि याच दिवशी मात्र एका आईने असा कांड केला आहे. त्यामुळे सर्वच जण चक्रावले आहेत. 

मुलीचा साखरपुडा अवघ्या ५ दिवसांवर आलेला असताना तिच्या आईनेच प्रियकरासोबत पलायन करून लग्न उरकल्याची एक धक्कादायक आणि तितकीच विचित्र घटना समोर आली आहे. जळगाव जिल्ह्यातील जामनेर शहरात ही घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पीडित कुटुंबावर सामाजिक नाचक्कीची वेळ आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जामनेर शहरातील एका कुटुंबात मुलीचा साखरपुडा ठरला होता. त्यांच्या घरात लग्नाची आणि साखरपुड्याची तयारी घरात उत्साहात सुरू होती. मात्र साखरपुड्याला अवघे पाच दिवस शिल्लक असतानाच मुलीच्या आईने अचानक घरातून पळ काढला. यानंतर तिने आपल्या प्रियकरासोबत थेट लग्न केले. हा सर्व प्रकार गुप्त होता.

मात्र तिच्या आईच्या प्रियकराने त्यांच्या विवाहाचे फोटो आपल्या मोबाईलच्या व्हाट्सॲप स्टेटसवर ठेवताच हा सर्व प्रकार उघडकीस आला. प्रियकराने स्टेटस ठेवताच संबंधित महिलेच्या नातेवाईकांनी आणि ओळखीच्या लोकांनी ते फोटो पाहिले. यानंतर मुलीच्या कुटुंबाला प्रचंड मानसिक धक्का बसला. ज्या घरात आनंदाचे वातावरण होते, तिथे अचानक शांतता पसरली. आपल्या पत्नीने असे पाऊल उचलल्याने आणि प्रियकराने ते फोटो सोशल मीडियावर जाहीर केल्याने समाजात कुटुंबाची मोठी नाचक्की सुरू झाली. या परिस्थितीने हतबल झालेला महिलेचा पती थेट जामनेर पोलीस ठाण्यात पोहोचला.

पाच दिवसांवर मुलीचा साखरपुडा आहे, समाजात आमची मोठी नाचक्की होत आहे. कृपया त्यांना ते मोबाईलवरील स्टेटस तातडीने काढायला सांगा, अशी केविलवाणी आणि आर्त विनंती पतीने पोलिसांकडे केली.

पतीची ही हृदयद्रावक व्यथा ऐकल्यानंतर जामनेर पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तातडीने पावले उचलली. पोलिसांनी तात्काळ त्या प्रियकराला पोलीस ठाण्यात बोलावून घेतले. त्याला कायद्याचा आणि सामाजिक परिस्थितीचा खाक्या दाखवत योग्य ती समज दिली. पोलिसांनी समज दिल्यानंतर प्रियकराने आपल्या मोबाईलवरून ते स्टेटस हटवले. त्यानंतर या संपूर्ण प्रकरणावर तात्पुरता पडदा पडल्याची माहिती समोर आली आहे. मात्र या अजब लग्नाची चर्चा आता संपूर्ण जळगाव जिल्ह्यात रंगली आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group