सध्या मुंबईमध्ये सुमारे 10 टक्के पाणीकपात लागू असून, अनेक भागांमध्ये जलवाहिन्यांच्या दुरुस्तीची कामे सुरू आहेत. तसेच उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाण्याची मागणीही वाढली आहे.याचदरम्यान आतामुंबईकरांसाठी एक चिंताजनक बातमी समोर आली आहे.
मुंबईतील खासगी पाणी टँकर व्यवसायावर केंद्रीय भूजल प्राधिकरणाच्या (CGWA) नियमांच्या अंमलबजावणीचा मोठा परिणाम होत असल्याचे समोर आले आहे. नियमांमुळे भूजल उपसा आणि त्याच्या वापरावर निर्बंध आल्याने टँकर व्यावसायिकांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई वॉटर टँकर असोसिएशनने राज्य सरकारकडे तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, खासगी पाणी टँकर व्यवसाय अडचणीत आला असून, यावर तातडीने तोडगा न काढल्यास मुंबईतील खासगी पाणी टँकर सेवा बंद करण्याचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई वॉटर टँकर असोसिएशनने याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
संघटनेने प्रशासनाकडे विविध मागण्या मांडल्या असून, त्यावर सकारात्मक निर्णय न झाल्यास आज रात्री 12 वाजल्यापासून मुंबईतील सर्व खासगी पाणी टँकर सेवा बंद करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
सध्या मुंबईमध्ये सुमारे 10 टक्के पाणीकपात लागू असून, अनेक भागांमध्ये जलवाहिन्यांच्या दुरुस्तीची कामे सुरू आहेत. तसेच उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाण्याची मागणीही वाढली आहे. अशा परिस्थितीत खासगी टँकरद्वारे मोठ्या प्रमाणात पाणीपुरवठा केला जात असून, अनेक गृहनिर्माण संस्था, व्यावसायिक आस्थापना आणि नागरिक या सेवांवर अवलंबून आहेत.
दरम्यान, खासगी टँकर सेवा बंद झाल्यास मुंबईतील पाणीपुरवठा व्यवस्थेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे प्रशासन आणि टँकर संघटना यांच्यातील चर्चेकडे मुंबईकरांचे लक्ष लागले असून, संभाव्य पाणी संकट टाळण्यासाठी तातडीने तोडगा निघण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.