महाराष्ट्रात नव्या राजकीय पक्षाचा उदय...! संभाजीराजे छत्रपतींच्या संघटनेला पक्ष म्हणून मान्यता, निवडणूक आयोगकडून चिन्हही मिळालं
महाराष्ट्रात नव्या राजकीय पक्षाचा उदय...! संभाजीराजे छत्रपतींच्या संघटनेला पक्ष म्हणून मान्यता, निवडणूक आयोगकडून चिन्हही मिळालं
img
Dipali Ghadwaje
राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. त्यामुळे सध्या राजकीय घडामोडी वेगाने सुरु आहेत. महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी लढत विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळत आहे. महाविकासआघाडी आणि महायुतीत जागावाटपाच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. तर काही पक्षांकडून उमेदवारांच्या नावाच्या घोषणा होताना दिसत आहे. त्यातच आता महाराष्ट्रात एका नव्या राजकीय पक्षाचा उदय झाला आहे. विशेष म्हणजे या पक्षाची निवडणूक आयोगाकडे नोंदणी झाली असून चिन्हंदेखील ठरलं आहे.

कोल्हापूरचे छत्रपती संभजीराजेंच्या स्वराज्य संघटनेला निवडणूक आयोगाकडून पक्ष म्हणून मान्यता मिळाली. संभाजीराजे छत्रपतींच्या संघटनेला 'महाराष्ट्र स्वराज्य पक्ष' म्हणून भारत निवडणूक आयोगाने मान्यता दिली. तसेच महाराष्ट्र स्वराज्य पक्ष आगामी विधानसभा निवडणुका लढवणार असल्याचे निश्चित झाले आहे.

निवडणूक लढवण्यासाठी त्यांना सप्त किरणांसह पेनाची निब हे निवडणूक चिन्ह मिळाले आहे. स्वत:संभाजीराजे छत्रपतींनी सोशल मीडियावर पोस्ट करत ही आनंदवार्ता सर्वांसोबत शेअर केली आहे.

छत्रपती संभजीराजेंनी आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवर पोस्ट करत ही आनंदाची बातमी सर्वांना सांगितली. त्यांनी या पोस्टमध्ये लिहिले की, 'आनंदवार्ता…! स्वराज्य संघटनेचे सर्व कार्यकर्ते, चाहते व हितचिंतक तसेच तमाम महाराष्ट्रवासियांना कळविणेस अत्यंत आनंद होतो की, ९ ऑगस्ट २०२२ रोजी तुळजाभवानी मातेच्या साक्षीने आणि हजारो शेतकरी, कष्टकऱ्यांच्या साथीने स्थापन झालेली 'स्वराज्य संघटना' आता भारतीय निवडणूक आयोगाकडे 'महाराष्ट्र स्वराज्य पक्ष' या नावाने एक राजकीय पक्ष म्हणून अधिकृतपणे नोंदणीकृत झालेला आहे. अर्थातच, स्वराज्य संघटना आजपासून 'महाराष्ट्र स्वराज्य पक्ष' म्हणून ओळखला जाईल.'

तसंच, 'याचबरोबर, आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र स्वराज्य पक्षाला 'सप्तकिरणांसह पेनाची निब' हे निवडणूक चिन्ह प्राप्त झालेले आहे. मागील वर्षभरात आपण आपली संघटना एक पक्ष म्हणून घराघरात पोहोचवलीच आहे, आता अधिक जोमाने आपल्याला मिळालेले निवडणूक चिन्ह देखील सर्व मतदारांपर्यंत पोहोचवणे आपले कर्तव्य आहे. 

महाराष्ट्रातील जनतेचे आपल्यावर असलेले प्रेम, पक्ष संघटनेचे कार्यकर्ते व हितचिंतकांचे कष्ट, राज्याच्या राजकारणाला असलेली एका नवीन व सुसंस्कृत पर्यायाची आवश्यकता ही आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करत, परिवर्तन महाशक्तीस सत्तास्थानी घेऊन जाईल, हे निश्चित! जय स्वराज्य !', असे देखील त्यांनी म्हटले आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group