नाशिक सत्र न्यायालयात अशोक खरातविरोधात काल सुनावणी पार पडली. खरात याला २९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. वासनांध अशोक खरातचे अनेक कारनामे समोर आले आहेत , तर अनेक काळे कारनामे हळू हळू समोर येत आहेत. सध्या एसआयटीकडून अशोक खरातची चौकशी सुरु आहे. दरम्यान, भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
गोपीचंद पडळकर यांचे खळबळजनक आरोप
सार्वजनिक कार्यक्रमातील फोटोला महत्त्व नाही, नेते मंडळी गेले तर काही नाही. मात्र, मठात जाणं, मंदिरात जाणं, पूजापद्धीतीचा अवलंब करणं हे घातक आहे. जयंत पाटील यांची देखील सखोल चौकशी व्हावी. जयंत पाटील त्यांच्या मुलाला देखील ईशान्येश्वर मंदिरात घेऊन गेले होते, असा दावा भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांनी केला आहे. तसेच अशोक खरात ईश्वरपूरला गेलेला. यावेळी राजकीय करिअर करण्याच्या हेतूनं जयंत पाटील यांना रक्ताची आंघोळ घातलेली, असा खळबळजनक दावाही गोपीचंद पडळकरांनी एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना केला. तसेच ही आंघोळ माणसाच्या रक्ताने घातली की कुणाच्या रक्ताने घातली हे समोर आलं पाहिजे. नरबळी देखील अशोक खरातने दिलेत अशी चर्चा आहे, अशात नेमणं कोणाचं रक्त ते होतं, हे समोर आलं पाहिजे, असं गोपीचंद पडळकर म्हणाले.
जयंत पाटील पुरोगामी आहेत, मग कशाला गेले होते, काय कारण आहे?, ते तर देवधर्म मानत नाहीत, मग कशाला गेले होते. महिला अत्याचारावर त्यांची काय भूमिका आहे? हे पण तपासायला पाहिजे. गर्भवती महिलांवर अत्याचार करणारा यांचा गुरू आहे. अशोक खरात पाटील यांच्याकडे पूजा घालतो, हे सगळ्या ईश्वरपूरला माहिती आहे. जयंत पाटील यांचा बुरखा समोर आला पाहिजे, अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली.