लोकशाहीचे मंदिर मानल्या जाणाऱ्या महाराष्ट्र विधानभवनात गुरुवारी अत्यंत लाजिरवाणा प्रकार घडला. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये विधानभवनामध्येच राडा झाला. एवढ्यावरच न थांबता या राड्यानंतर मध्यरात्रीही मोठ्या घडामोडी झाल्याचे पाहायला मिळाले. या सर्व घडामोडींनी राज्यातील राजकारण आणि समाजमन अस्वस्थ झालं आहे.
दरम्यान, या घटनेनंतर शहाणे होत विधानभवन सुरक्षा कार्यालयाने महत्वाचा निर्णय घेतला आहे. विधानभवनात कोणत्याही सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. विशेष परवानगी घेतल्यानंतर या मंडळींना प्रवेश मिळणार आहे.
नेमकं प्रकरण काय ?
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विधानभवनाच्या परिसरात आमदार गोपीचंद पडळकर यांना मंगळसूत्र चोर म्हणून डिवचले होते. यानंतर बुधवारी पडळकर आणि आव्हाड आमनेसामने आले असता दोन्हीकडून एकमेकांना शिवीगाळ करण्यात आली होती. यानंतर आमदार आव्हाड यांनी मला जिवे मारण्याची धमकी देण्यात आली असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते विधानभवनाच्या आवारात एकमेकांना भिडले. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून विरोधकांकडून राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
या घटनेनंतर सर्वच क्षेत्रांतून संताप व्यक्त केला जात आहे. विधिमंडळाच्या आवारात अशा पद्धतीने मारामारी होणे अत्यंत चुकीचे असल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
या घटनेचा सविस्तर अहवाल मागवण्यात आल्याचे विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर यांनी सांगितले. यानंतर आता विधानसभा सुरक्षा कार्यालयाने एक मोठा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, आज विधानभवनामध्ये कोणत्याही प्रकारचे शासकीय कर्मचारी अधिकारी यांना येण्यास परवानगी राहणार नाही. विशेष परवानगी पत्र घेऊनच प्रवेश मिळेल. आज सर्व पद्धतीचे इतर पासेस प्रवेशासाठी रद्द करण्यात आले आहेत. विधानभवन कामकाजाचा आज शेवटचा दिवस असतानाच हा निर्णय घेण्यात आला आहे.