सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अशोक खरातचा मोबाईल सीडीआर बाहेर काढला आणि खरातशी कोण कोण संपर्कात होतं याची माहिती जगजाहीर केली. त्यानंतर त्यावरून मोठा गोंधळ सुरू झाला आहे. CDR बाहेर काढल्यामुळे अनेकांकडून अंजली दमानिया यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्यात येत आहे.
अशोक खरातचा सीडीआर हा एसआयटी काढत नाही तर कुणीतरी बाहेरचा व्यक्ती काढते, ही बाब अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे सीडीआर बाहेर काढलेल्या दमानिया यांच्यावर कारवाई करावीच, पण त्यामध्ये नाव असलेल्या एकनाथ शिंदे यांची एसआयटी चौकशी कधी करणार, असा प्रश्न ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी विचारला. दीपक केसरकर हे या प्रकरणातील सर्व कड्या जोडणारे व्यक्ती आहेत, त्यांना एसआयटीकडून कधी चौकशीला बोलावले जाणार याची माहिती द्यावी अशी मागणीही अंधारे यांनी केली.
एकनाथ शिंदे यांच्यावर एसआयटी कारवाई करणार आहे का? एसआयटी चांगलं काम करेल अशी अपेक्षा आहे, पण नाईलाजाने त्याच्या तपासाच्या गतीवर टीका करावी लागतेय असं सुषमा अंधारे म्हणाल्या. एखादी माहिती अंजली दमानिया आणि माझ्यापर्यंत पोहोचते, पण तीच माहिती एसआयटीपर्यंत का पोहोचत नाही असा प्रश्न पडतोय, असंही त्या म्हणाल्या. या काळात पुरावे नष्ट केले जाऊ शकतात. एकनाथ शिंदे आणि दीपक केसरकर ही नावं मोठी आहेत, त्यामुळे त्यांची चौकशी का केली जात नाही? असा प्रश्नही अंधारे यांनी विचारला.
रुपाली चाकणकर यांना आतापर्यंत चौकशीला बोलवलं जात नाही. अशोक खरातचा निकटवर्तीय नामकर्ण आवारे याच्यावर कारवाई का केली जात नाही? अशोक खरातचा सीए ललित पोकळे याची चौकशी का केली जात नाही? नाशिकच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचा यामध्ये हात असून त्याची माहिती आम्ही एसआयटीला दिली आहे. परंतु त्यावर अद्याप काहीही कारवाई केली जात नाही, असं सुषमा अंधारे म्हणाल्या.
अधोरी विद्या, तंत्रमंत्र आणि वर्षा बंगल्यावर रेड्याचे शिंग पुरले आहेत अशी सारखी चर्चा केली जात आहे. कुणाच्या तरी फोटोवर फुल्या मारल्या याची चर्चा सातत्याने सुरू असते. राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या फोटोवर जर कुणी फुल्या मारल्या असतील तर ती अत्यंत गंभीर गोष्ट आहे. त्यामुळे कुणाचा फायदा होणार आहे? याची माहिती समोर आणावी, अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली.