नवी दिल्ली (भ्रमर वृत्तसेवा) :- इराण आणि अमेरिका युद्धाचे सर्व काही होर्मुझ खाडीत येऊन अडकले आहे. इराणच्या होर्मुझ खाडीतून दररोज 15 जहाजे आरामात निघू शकतात; पण या जहाजांना होर्मुझ खाडी पार करण्यापूर्वी इराणची परवानगी घ्यावी लागेल. तसेच त्यांना आता फी स्वरूपात पैसेही द्यावे लागणार आहेत.
इराणची परवानगी असल्याशिवाय एकही जहाज होर्मुझमधून जाऊ शकत नाही. भारताचा झेंडा असलेले जहाज ग्रीन आशा होर्मुझ खाडीतून निघाले. यात 15,400 टन एलपीजी गॅस असल्याची माहिती मिळत आहे. हे जहाज मुंबईच्या जवाहरलाल नेहरू पोर्ट ऑथॉरिटीला पोहोचले. नुकत्याच मिळालेल्या रिपोर्टनुसार, होर्मुझ खाडी वापरण्याकरिता ओमान आणि इराण फी घेत आहे. या युद्धापूर्वी होर्मुझ खाडीच्या वापराकरिता कोणत्याही प्रकारची फी नव्हती. भारताचे 15 जहाजे होर्मुझ खाडीत अडकली आहेत; मात्र या पूर्ण जहाजांना खाडी ओलांडण्याची परवानगी देण्यात आली नाही.
दोन आठवड्यांच्या युद्धबंदीनंतरही इराणकडून होर्मुझ खाडी पूर्ण खुली करण्यात आली नाही. पाकिस्तानमध्ये बैठक होत आहे. यात युद्धबंदी करार होण्याची शक्यता आहे. रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार, मागील 24 तासांमध्ये होर्मुझ खाडीतून एक तेल जहाजा आणि पाच इतर जहाजे गेली आहेत. इराणचा झेंडा असलेली दोन तेल जहाजेही होर्मुझमधून गेली. होर्मुझ खाडीत इराण पैसे वसूल करीत असल्याने भारताचेही टेन्शन वाढले आहे. कारण भारतात एलपीजी गॅस आणि कच्चे तेल होर्मुझ मार्गेच दाखल होते. भारताला आता इराणला होर्मुझसाठी मोठा पैसा द्यावा लागणार आहे; मात्र होर्मुझ खाडीत इराणकडून नक्की किती रुपये फी आकारली जात आहे, याबाबत काही माहिती मिळू शकली नाही. अमेरिकेने या शुल्काला विरोध केला. इराणने तत्काळ होर्मुझ खाडीत पैसा वसूल करणे बंद करावे, असे अमेरिकेने म्हटले आहे. इराणकडून होर्मुझ खाडीतून जाणार्या सर्वच जहाजांकडून पैसे घेतले जात आहेत.
युद्ध सुरू होण्यापूर्वी इराण होर्मुझ खाडीतून कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारत नव्हते. यासोबतच अजूनही इराणच्या परवानगीशिवाय कोणत्याही देशाच्या जहाजाला होर्मुझ खाडी वापरता येणार नाही. इराणने म्हटले, की आम्ही आमच्या मित्र देशांकरिता होर्मुझ खाडी खुली ठेवली आहे. दुश्मन देश आणि त्यांना मदत करणार्यांकरिता खाडी बंद आहे.