गेल्या काही दिवसांपासून इंधन दरात वाढ होत असून आता इंधनाची चणचण जाणवायला लागली आहे. दरम्यान, आता यासंदर्भात या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ऍक्शन मोडमध्ये आले आहेत.
अधिक माहिती अशी की , “पेट्रोल व डिझेल टंचाई संदर्भात सातत्याने चर्चा सुरु आहेत. त्यात असं लक्षात येतय की सरासरी पेक्षा पेट्रोल व डिझेलची मागणी वाढली आहे. त्याची पुर्तता करत आहोत. मात्र यात साठेबाजी होताना निदर्शनास येत आहे. आता पुरवठा विभाग व गृह विभाग संयुक्त कारवाई करतील. पेट्रोलचा जो आपला वापर आहे त्यापेक्षा 23 टक्के जास्त पुरवठा करत आहोत. डिझेल संदर्भात 52 टक्के मागणी वाढली आहे” अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. “मागीलवर्षी याच काळात प्रतिदिन पुरवठा होता, त्यापेक्षा 52 टक्के जास्त पेट्रोल-डिझेलची मागणी होतेय. त्याचा पुरवठा करतोय तरी टंचाई सदृश्य स्थिती तयार होतेय” ही माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
“अकोल्याला 154 टक्के मागणी वाढली आहे. इतर जिल्ह्यात 70 टक्क्यांपेक्षा जास्त खपत झाली आहे. शेतकऱ्यांना डिझेल मिळावे म्हणून आपण प्रयत्न करतोय. पण त्याचा गैरवापर काही जण करत आहेत. कमर्शियल कडे नॉर्मल खपत वळवली जात आहे का याचा शोध घेत आहोत” असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. “52 टक्के मागणी वाढली, तरी पुरवठा सुरु आहे. कुणीतरी साठेबाजी करत आहे. ती थांबवण्याचा प्रयत्न सुरु आहे” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
शनिवारी सुद्धा या विषयावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणालेले की,”शेतकऱ्यांना जे काही डिझेल लागेल ते उपलब्ध करुन द्या. पण शेतकऱ्यांच्या नावाखाली कोणी साठेबाजी करत असेल, तर त्यावरही लक्ष ठेवा” “कारण काही भागांमध्ये अचानक 20 ते 30 टक्के डिझेल, पेट्रोलची मागणी वाढली आहे. दरवर्षी किती डिझेल लागतं त्याची आपल्याला कल्पना आहे. अचानक 20 ते 30 टक्के मागणी वाढली असेल तर गडबड देखील असू शकते” असं मुख्यमंत्री त्यावेळी म्हणाले.