दहावीचा निकाल लागल्यांनंतर आता महाविद्यालयीन प्रवेशाच्या प्रक्रियेची लगबग सुरु झाली आहे. दरम्यान, आता अकरावीला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. राज्य सरकारने प्रवेश प्रक्रियेबाबत काही महत्वाच्या सूचना केल्या आहेत. इयत्ता ११वी (FYJC) प्रवेश प्रक्रिया २०२५-२६ अंतर्गत आज दिनांक २६ मे २०२५, सकाळी १० वाजता प्रवेश प्रक्रियेकरिता ऑनलाईन नोंदणी पोर्टल कार्यान्वित करण्यात आले आहे. या पोर्टलच्या माध्यमातून आज पहिल्या दिवशी २ लाख ५८ हजार ८८७ विद्यार्थ्यांनी आपली नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली असल्याची माहिती शिक्षण संचालक तथा अध्यक्ष, राज्यस्तर प्रवेश संनियंत्रण समिती (माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण) डॉ.महेश पालकर यांनी दिली आहे.

या प्रवेश प्रक्रियेत नोंदणीकृत महाविद्यालयांची संख्या ९,३३८ असून ‘CAP’ अंतर्गत १८,७४,९३५ जागा उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीनुसार कमाल १० उच्च माध्यमिक विद्यालये निवडण्याची सुविधा पोर्टलवर उपलब्ध आहे. यासाठी ऑनलाईन पद्धतीने प्रवेश अर्ज सादर करावा लागणार असून अर्जात नमूद केलेल्या प्राधान्यक्रमानुसार, आराखडा आणि गुणवत्ता गुणांच्या आधारे प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
व्यवस्थापन कोटा, संस्था अंतर्गत कोटा व अल्पसंख्याक कोट्यातून मिळालेल्या प्रवेशाच्या रद्द करण्यासंदर्भातील कार्यपद्धती विद्यार्थ्यांनी नीट समजून घ्यावी. प्रत्येक प्रवेश फेरीत विद्यार्थ्यांनी संमती अनिवार्यपणे नोंदवणे आवश्यक आहे. ज्यांना प्रथम फेरीत प्रवेश मिळणार नाही अशा विद्यार्थ्यांना पुढील फेऱ्यांमध्ये सहभागी होण्याची संधी असेल. ५ जून २०२५ रोजी तात्पुरती सर्वसाधारण प्रवेश यादी जाहीर करण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांना फॉर्म भरताना मदत मिळावी, तसेच महाविद्यालयांकडून प्रवेश प्रक्रियेत आवश्यक कागदपत्रांची तपासणी योग्यरित्या व्हावी यासाठी विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयामार्फत प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. प्रवेश प्रक्रियेची संपूर्ण माहिती माहिती पुस्तिकेत व ऑनलाईन पोर्टलवर उपलब्ध आहे. प्रवेश प्रक्रियेदरम्यान उद्भवणाऱ्या अडचणींच्या सोडवणुकीसाठी प्रत्येक विभागीय, जिल्हा व तालुका स्तरावर मार्गदर्शन व मदत केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत.