विधानसभा निवडणुकीत महायुतीने ऐतिहासिक विजय प्राप्त केला तर दुसरीकडे महाविकास आघाडीला मात्र अवघ्या 50 जागांवरच समाधान मानावं लागलं. विधानसभा निवडणुकीत भाजप हा राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरला.दरम्यान विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीला गळती लागल्याचं चित्र आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गटातील अनेक नेते महायुतीमध्ये प्रवेश करत आहेत. दरम्यान आता राष्ट्रवादी शरद पवार गटाला आणखी एक मोठा धक्क बसला आहे.

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी आमदार दिलीप वाघ आणि माजी नगराध्यक्ष संजय वाघ यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तर दुसरीकडे कर्जत जामखेडमध्ये देखील राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे, सात नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. पुढील काही महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे, या पार्श्वभूमीवर हा राष्ट्रवादी शरद पवार गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या दोन बड्या नेत्यांनी आणि सात नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.