जिल्हा बँकेचे अध्यक्षपद जाताच बच्चू कडूंचा भाजपवर जोरदार हल्लाबोल
जिल्हा बँकेचे अध्यक्षपद जाताच बच्चू कडूंचा भाजपवर जोरदार हल्लाबोल
img
नंदिनी मोरे
राज्यातील अनेक  घडामोडींना वेग आला असून  बच्चू कडूंना जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावरून दूर करण्यात आले आहे. दरम्यान,  हे अध्यक्ष पद जाताच बच्चू कडू यांनी  भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. 

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीविरोधात लढा पुकारलेला असताना बच्चू कडू यांना जोरदार दणका बसला. नाशिक सत्र न्यायालयाने एक वर्षांची शिक्षा सुनावल्याने जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी राहता येणार नाही, असे सांगून विभागीय सहनिबंधकांनी त्यांना अध्यक्षपदावरून दूर केले. शेतकऱ्यांच्या न्यायासाठीचा लढा तीव्र झालेला असतानाच बच्चू कडू यांना राजकीय झटका बसला. यावर प्रतिक्रिया देताना बच्चू कडू यांनी संताप व्यक्त करीत भाजपच्या राज्यापेक्षा मोगलाई बरी होती, असे म्हटले.

अमरावती जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावरून बच्चू कडू यांना अपात्र ठरविण्यात आले आहे. कडू यांना शासकीय कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी नाशिक सत्र न्यायालयाने एका वर्षाची शिक्षा सुनावली होती. याच शिक्षेचा दाखला देऊन त्यांची निवड रद्द करण्यात येत असल्याचे विभागीय सहनिबंधक यांनी सांगितले.

बच्चू कडू यांचे बँकेचे अध्यक्षपद गेल्यानंतर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना भाजपविरोधात आरपारच्या लढाईची घोषणा केली. हम करे सो कायदा ही भाजपची शैली राहिलेली आहे. आमच्याविरोधात कुणी बोलायचे नाही. आम्हाला कुणी प्रश्न विचारायचे नाही. आमच्याविरोधात बोलाल तर ठेचून काढू, असे भाजपने नेहमी केले. मात्र आम्ही घारबरण्यांपैकी नक्कीच नाही. आमच्या श्वासात श्वास असेपर्यंत आणि शरीरात रक्ताचा अखेरचा थेंब असेपर्यंत आम्ही लढत राहू. भाजपच्या अशा राज्यापैकी मोगलाई बरी होती, अशी उद्विग्न प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली.

शेतकऱ्यांसाठीचे आंदोलन छेडल्यानंतर तुम्हाला घेरले जाईल. तुमचे अध्यक्षपद धोक्यात येईल, असे आम्हाला आधीच अनेकांनी सांगितले होते. शेतकरी आंदोलनाचे परिणाम आम्हालाही माहिती होते. शांत राहिले तर तुम्ही टिकून राहाल, असे सांगत अनेकांकडून धमकाविण्याच्या गोष्टी सुरूच होत्या. परंतु तरीही आम्ही शेतकऱ्यांच्या न्यायासाठी लढाई लढली. अशीच लढाई शेतमजूर आणि दिव्यांगांसाठी लढू, असे आश्वस्त करताना ज्यांच्यापुढे आमची सुनावणी झाली ते एका मंत्र्‍याचा नातेवाईक आहेत. या निर्णयाविरोधात आम्ही अपील करू, असे बच्चू कडू यांनी सांगितले.

शेतकऱ्यांसाठी उपोषण करून कर्जमाफीचा मु्द्दा ऐरणीवर आणल्याने सध्या बच्चू कडू यांची राज्यात चर्चा सुरू आहे. त्याचवेळी त्यांचे अध्यक्षपद गेल्याने, दोन्ही घटनांच्या टायमिंगची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group