राज्यात सध्या पावसाने धुमाकूळ घातला असून अनेक जिल्ह्यांना पावसाने झोडपले आहे. परंतु या मुसळधार पावसामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहे. दरम्यान अशीच एक हृदयद्रावक घटना आता समोर आली आहे.
मुसळधार पावसाने गुरुवारी कोल्हापूरला झोडपलं आहे. सायंकाळच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. तासाभर पडलेल्या पावसाने अनेक ओढे, नाले ओसांडून वाहत होते. मुसळधार पावसामुळे ओढा ओलंडताना एका शाळकरी मुलाचा पाण्यात वाहून गेल्याने मृत्यू झाला आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या बचाव पथकाने रात्री उशीरापर्यंत शोध मोहीम घेतली. मात्र मुलगा मिळाला नाही. अखेर शुक्रवारी सकाळी नाल्याजवळील दाट झाडीत मुलाचा मृतदेह मिळून आला.
समोर आलेल्या माहितीनुसार, अमान जमानुल्ला भालदर असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. अमान हा उजळाईवाडीच्या धोंडेनगर परिसरात राहत होता. संध्याकाळी 5 ते 5.15 च्या सुमारास ट्युशनला जात होता. ट्युशनला जाताना सरनोबतवाडीच्या दिशेने जाताना वाटेत ओढा ओलंडण्यासाठी सायकल घेऊन ओढ्यात उतरला. ओढ्यातील पाण प्रचंड वेगाने वाहत होते.पाण्याच्या प्रचंड प्रवाहामुळे त्याचा तोल गेल्याने तो वाहून गेला. ज्यावेळी अमानचा तोल गेला त्यावेळी तिथे जवळ असणारे वीट कारखान्याचे मालक आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी त्याला वाचवण्यासाठी धाव घेतली.
अमान वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू होते. तो देखील ओढ्यातील एका बेटाला धरुन उभा होता. मात्र त्याच्या जॅकेटमध्ये पाणी भरल्याने ते चेहऱ्यासमोर आले आणि त्याचा हात सटकला आणि तो वाहून गेला. त्यानंतर आपत्ती व्यवस्थापन पथक, अग्निशमन दल आणि पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तात्काळ शोधकार्य सुरू केले.
मात्र चिखल, अंधार आणि पाण्याचा वेग यामुळे शोध मोहिमेत अडचणी आल्या. रात्री उशिरा शोधमोहीम थांबवण्यात आली. सकाळी पुन्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या के डी आर एफ पथकाने शोधमोहीम सुरू केली आणि अमान एका घनदाट झाडीत मिळून आला. नाका तोंडात पाणी गेल्याने त्याचा मृत्यू झाला होता.