आरसीबीच्या ऐतिहासिक विजयानंतर स्टेडियमबाहेर जल्लोषासाठी चाहते आले होते. मात्र चेंगराचेंगरीत चाहत्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. आरसीबीने 3 जून रोजी अहमदाबादमध्ये झालेल्या अंतिम सामन्यात पंजाबवर मात करत आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरलं. त्यानंतर 4 जून रोजी एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये खेळाडूंच्या सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं. त्यासाठी चाहत्यांनाही आमंत्रित करण्यात आलं. स्टेडियममध्ये चाहत्यांना फ्री एन्ट्री ठेवण्यात आली. यावेळी बंगळुरुतील एम चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर 4 जून रोजी झालेल्या चेंगराचेंगरीत 11 जणांचा मृत्यू झाला. तर 50 पेक्षा अधिक जण जखमी झाले.
दरम्यान, कर्नाटक सरकारने या 11 मृतांच्या कुटुंबियांबाबत मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने मृतांच्या कुटुंबियांसाठी जाहीर केलेल्या आर्थिक मदतीत वाढ केली आहे.राज्य सरकारकडून मृतांच्या कुटुंबियांना आणखी 15 लाख देण्यात येणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे.
एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृ्त्तानुसार, मृतांच्या कुटुंबियांना आता प्रत्येकी 25 लाख रुपये मदत देण्यात येणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. याआधी 10 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली होती.