माजी मंत्री बच्चू कडू यांची प्रकृती खालावली असल्याची बातमी समोर येत आहे. गेल्या काही दिवसांपासून बेमुदत अन्नत्याग आंदोलन करत असलेल्या माजी मंत्री बच्चू कडू यांची प्रकृती खालावली आहे. ते सध्या आंदोलनस्थळीच असून त्यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना पुढच्या अर्धा तास कोणालाही भेटण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे आता बच्चू कडू यांची प्रकृती नेमकी कशी आहे? त्यांना नेमका काय त्रास होतोय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
दुसरीकडे बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाची संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी प्रहार संघटनेचे महाराष्ट्रभरातील कार्यकर्ते अमरावती शहरात दाखल होत आहेत. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील शेतकरीदेखील बच्चू कडू यांच्या गुरुकुंज मोझरी येथील उपोषणस्थळी जमा होत आहेत. असे असताना बच्चू कडू यांची प्रकृती खालावली आहे.
दरम्यान, बच्चू कडू यांच्या या आंदोलनाला दिवसेंदिवस पाठिंबा वाढत चालला असून बच्चू कडू यांनी काहीही झालं तरी मी अन्नाचा एकही कण खाणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. जोपर्यंत माझ्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत मी माघार घेणार नाही. काहीही झालं तरी मी अन्नाचा कण खाणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलंय. त्यांच्या या भूमिकेमुळे 10 जून रोजी 2 किलो वजन कमी झाले होते. आज तर त्यांची प्रकृती खालावली आहे. सध्या त्यांच्या प्रकृतीची काळजी घेण्यासाठी डॉक्टर कार्यरत आहेत. त्यांनीच पुढचा अर्धा तास बच्चू यांची कोणालाही भेट घेता येणार नाही, असे डॉक्टरांनी सांगितलेले आहे.