मुंबई- 'उमेदवारी मिळाली नाही म्हणून कोणीही नाराज होऊ नका. पक्ष हे एक कुटुंब आहे, ही भावना जोपासा आणि कामाला लागा,' असे भावनिक आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नरहरी झिरवाळ यांनी केले. राष्ट्रवादीच्या महत्त्वाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
कुटुंबाची भावना आणि संधीचे आश्वासन
झिरवाळ म्हणाले, "स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक ही पूर्णपणे कार्यकर्त्यांची आहे. पक्षाला मोठे करण्यात कार्यकर्त्यांचा वाटा सर्वात महत्त्वाचा आहे. कार्यकर्त्यांना संधी देणे ही सर्व नेत्यांची जबाबदारी आहे आणि सर्वांना टप्प्याटप्प्याने संधी मिळणारच आहे."
यावेळी त्यांनी स्पष्ट केले की, यंदाच्या निवडणुकीत केवळ 'इच्छा' नव्हे, तर उमेदवाराची समाजातील प्रतिमा कशी आहे, याला महत्त्व दिले जाणार आहे.
"ज्यांना आता संधी दिली आहे, त्यांच्यासाठी आपण सर्वांनी अंग झटकून कामाला लागायचे आहे. राज्यात आपला पक्ष पहिल्या क्रमांकावर राहील, यासाठी एकजुटीने काम करा," असे आवाहन त्यांनी केले.
सर्व कार्यकर्ते एकसमान असले तरी, स्थानिक परिस्थिती पाहून उमेदवारीचा निर्णय घ्यावा लागणार असल्याचे स्पष्ट केले. "पक्षश्रेष्ठी जो निर्णय देतील, तो अंतिम राहील," असे सांगत त्यांनी पक्षाचे अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिलेल्या शब्दाप्रमाणे राज्यात राष्ट्रवादीला यश आणण्याचा संकल्प बोलून दाखवला.