वैष्णवी हगवणे हिने 16 मे रोजी आत्महत्या केली होती. राजेंद्र हगवणे यांच्या कुटुंबीयांनी तिचा छळ केला. सासरच्या जाचाला कंटाळूनच विष्णवी यांनी हे पाऊल उचलला असल्याचा आरोप आहे. वॆष्णवीच्या सासरच्या लोंकानी तिच्या माहेरच्यांना 2 कोटी रुपये मागितले होते. विशेष म्हणजे वैष्णवीच्या लग्नात 51 तोळे सोने, फॉर्च्यूनर कार तसेच चांदीची भांडी अशा वस्तू देण्यात आल्या होत्या. या प्रकरणात वैष्णवीचा नवरा शशांक, तिचा दीर, राजेंद्र हगवणे, वैष्णवीची सून, तिची नणंद हे सगळेच तुरुंगात आहेत.

दरम्यान, आता वैष्णवीचे हे प्रकरण समोर आल्यानंतर मराठा समाजाने समोर येऊन मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे आता हुंडाबळी तसेच खोट्या तामझामामुळे महिलांचे बळी जाणार नाहीत, अशी भावना व्यक्त केली जात आहे.वैष्णवी हगवणे हिच्या आत्महत्येचे प्रकरण समोर आल्यानंतर मराठा समुदायाने लग्नात होणारा वायफळ खर्च थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. मराठा समाजाचे अनेक कार्यकर्ते, नेते यांनी एकत्र येत एक बैठक घेतली आहे. या बैठकीत वेगवेगळे निर्णय घेण्यात आले आहेत.
या बैठकीला पुण्यातील मराठा समाजाचे नेते, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. यात काँग्रेसचे नेते अरविंद शिंदे, अंकुश काकडे, आमदार चेतन तुपे, माजी महापौर राजलक्ष्मी भोसले, माजी नगरसेवक श्रीकांत शिरोळे, शरद पवार गटाचे प्रशांत जगताप, मराठा समाजाचे कार्यकर्ते राजेंद्र कोंधारे तसेच आदी नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते. लग्न समारंभात वायफळ खर्चावर आळा घालणे, सासू-सासरे यांनी सूनेला सन्मान द्यावा, आई-वडिलांनी मुलीच्या छळवणुकीविरोधात आवाज उठवावा असे ठराव मान्य करण्यात आले आहेत.
एखाद्या लग्नात मोठा तामझाम केला जात असेल तर मराठा समुदाय अशा लग्नांत सहभागी होणार नाही, असाही ठराव संमत करण्यात आला. वैष्णवीच्या आत्महत्येने आम्हा सर्वांना धक्का बसला आहे. या घटनेनंतर आता साध्या पद्धतीने लग्न करण्यासाठी आम्ही लोकांना प्रोत्साहित करणार आहोत, त्यासाठी एक मंच उभा केला जाईल, अशी माहिती श्रीकांत शिरोळे यांनी दिली.