पुण्यात वैष्णवी हगवणे या तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. दरम्यान हि आत्महत्या वैष्णवीने सासरच्यांना जाचाला कंटाळून केली असलायचा आरोप आहे. दरम्यान आता वैष्णवी हगवणे प्रकरणात महिला आयोगाच्या निष्काळजीपणावरून सर्वत्र टीका सुरू असताना महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या विरोधकांच्या निशाण्यावर आहेत. सामाजिक कार्यकर्त्या संगीता भालेराव यांनी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात महिला आयोगात तक्रार दाखल केली आहे.

हगवणे कुटुंबातून आधीच तक्रार झाली होती, तेव्हाच कार्यवाही केली असती तर वैष्णवी आज हयात असती, असे सांगत विरोधकांनी रुपाली चाकणकर यांना झोडपून काढले आहे. आता तर महिला आयोगात अध्यक्षा चाकणकर यांच्याविरोधातच तक्रार दाखल झाली असून त्यांच्यापासून जीविताला धोका असल्याचे भालेराव यांनी तक्रारीत म्हटले आहे. तसेच राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सोनाली गाडे आणि स्नेहल चव्हाण यांच्याविरोधातही भालेराव यांनी तक्रार दाखल केली आहे.
चाकणकर यांनी महिला आयोगाचे अध्यक्षपद मुक्त करावे, असे मी फेसबुकवर लिहिले. मयुरी हगवणेची तक्रार निकाली काढली असती तर आज आपल्याला वैष्णवी हयात दिसली असती. यात मी काहीही आक्षेपार्ह लिहिलेले नव्हते. चाकणकर यांच्याकडे महिला आयोगाचे अध्यक्षपद आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्षपदही आहे. त्यामुळे मुख्य कामाकडे त्यांचे दुर्लक्ष होत असावे, अशा हेतूने मी पोस्ट लिहिली होती. ज्या व्यक्तीला कायद्याचे ज्ञान आणि सामाजिक भान आहे, अशा व्यक्तीकडे महिला आयोगाचे अध्यक्षपद द्यावे, अशी मागणी मी पोस्टमधून केली होती.
त्यानंतर सोनाली गाडे आणि तिची सहकारी स्नेहल चव्हाण यांनी माझ्याविरोधात अरेरावीची भाषा वापरली. तसेच महिलांना लज्ज उत्पन्न होईल अशा पद्धतीने बोलल्या. सुरुवातीला आम्ही दुर्लक्ष केले. परंतु कुटुंबाच्या विनंतीवरून मी महिला आयोगात त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे. मला धमकी दिली, यांच्याविरोधात जर तक्रार दिली नाही तर या मुली अजूनही महिलांना धमक्या देतील. असले प्रकार होऊ नयेत, म्हणून मी तक्रार दाखल केली आहे, असे संगीता भालेराव यांनी सांगितले.