नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणानंतर संपूर्ण देशात खळबळ निर्माण झाली आहे. दरम्यान, 3 मे 2026 रोजी पार पडलेल्या परीक्षेचा पेपर अनेक राज्यांमध्ये फुटल्याचे तपासात समोर आल्यानंतर ही परीक्षा रद्द करण्यात आली असून आता ही परीक्षा 21 जून 2026 रोजी देशभरात पुन्हा घेण्यात येणार आहे.
पेपरफुटी प्रकरणानंतर विद्यार्थ्यांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी प्रथमच माध्यमांसमोर येत विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ देणार नसल्याचे स्पष्ट केले. “घटनेनंतर आम्ही तीन ते चार दिवस परिस्थितीचा आढावा घेतला आणि त्यानंतर परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी कोणतीही तडजोड होऊ देणार नाही,” असे त्यांनी सांगितले.
धर्मेंद्र प्रधान यांनी पुढे सांगितले की, NEET UG 2026 साठीची नवी प्रवेशपत्रे 14 जूनपर्यंत विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली जातील. तसेच, विद्यार्थ्यांना परीक्षेत अतिरिक्त 15 मिनिटांचा वेळ देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. “घडलेल्या प्रकारामुळे मी स्वतः खूप निराश आहे. मात्र काहीवेळा विद्यार्थ्यांच्या हितासाठी कठोर निर्णय घ्यावे लागतात,” असेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, सोशल मीडियाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची दिशाभूल होत असल्याचे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना अशा फसव्या दाव्यांपासून सावध राहण्याचे आवाहन केले. सरकारने तात्काळ या प्रकरणाचा तपास CBI कडे दिला असून, परीक्षा माफियांविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.