बहुचर्चित लाडकी बहीण योजने संदर्भात एक मोठी बातमी समोर येत आहे. या योजनेसंदर्भात एका बड्या नेत्यानं मोठं वक्तव्य केलं आहे. या वक्तव्याने आता महिलांमध्ये विविध चर्चांना उधाण आले आहे.
ई-केवायसी (e-KYC) पडताळणीच्या नावाखाली राज्यभरातून तब्बल ८१ लाख लाडक्या बहिणींची नावे लाभार्थी यादीतून वगळण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. आता यावरुन विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका करण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी यावरुन निशाणा साधला आहे.
रोहित पवार यांनी त्यांच्या अधिकृत ट्वीटरवर एक ट्वीट केले आहे. यात त्यांनी केवायसी हा केवळ एक बहाणा असून, लाभार्थी महिलांची संख्या टप्प्याटप्प्याने कमी करून ही योजनाच कायमची बंद करण्याचा सरकारचा छुपा अजेंडा आहे, असा घणाघाती आरोप रोहित पवारांनी केला.
रोहित पवारांचे ट्वीट
निवडणुकीपूर्वी 2.47 कोटी लाभार्थी असलेल्या लाडकी बहीण योजनेत या लबाड सरकारने 81 लाख लाडक्या बहिणींची नावे उडवली आहेत. KYC फक्त बहाणा आहे, लाभार्थी लाडक्या बहिणींची नावे टप्प्याटप्प्याने उडवून योजना बंद करणे हाच खरा निशाणा आहे.
आज या लाडक्या बहिणीला बोगस लाभार्थी म्हणणाऱ्या सरकारने निवडणुकीच्या तोंडावर कोणतीही KYC न करता योजना राबवली असेल तर ही लाडक्या बहिणीची फसवणूक करून सरकारने केलेली बोगसगिरी नाही का ? लाडक्या बहिणींना कुठल्याही प्रकारे त्रास दिला किंवा पैसे परत घेण्याची भाषा केली तर सरकारला महागात पडेल. त्यामुळे सरकारला या 15000 हजार कोटीची वसुली करायचीच असेल तर मंत्री आणि अधिकाऱ्यांकडून करावी, लाडक्या बहिणीला कुठल्याही प्रकारे त्रास दिला तर याद राखा…!, असे रोहित पवार म्हणाले.