भारतातील निम्म्याहून अधिक लोक प्रवास करण्यासाठी रेल्वेची निवड करतात. भारतीय रेल्वेमधून लाखो करोडो लोक दररोज प्रवास करतात. यामुळेच भारतीय रेल्वेला जीवनवाहिनी असे म्हटले जाते. भारतीय रेल्वेमध्ये गरीब, श्रीमंत असे सगळे प्रवास करू शकतात.
जर तुम्हीही थंडीच्या हंगामात रेल्वे प्रवासाचा बेत आखत असाल तर ही बातमी नक्की वाचा , सध्या हिवाळा सुरु झाला असून दाट धुके आणि कमी दृश्यमानता यामुळे गाड्यांच्या वेळापत्रकावर मोठा परिणाम होऊन प्रवाशांची गैरसोय होत आहे. अनेकदा गाड्यांना खूप विलंब झाल्याने प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. प्रवाशांची ही अडचण कमी करण्यासाठी आता भारतीय रेल्वेने खास व्यवस्था केली आहे.
जर राजधानी, शताब्दी किंवा दुरंतो एक्सप्रेस सारखी तुमची ट्रेन नियोजित वेळेपेक्षा दोन तास किंवा त्याहून अधिक विलंबाने आली तर आयआरसीटीसीच्या केटरिंग पॉलिसी अंतर्गत तुम्हाला मोफत जेवण मिळेल. प्रवाशांची सोय आणि सोयी-सुविधा लक्षात घेऊन ही सेवा दिली जाते. मात्र, सध्या ही सुविधा केवळ प्रीमियम गाड्यांपुरतीच मर्यादित आहे.
विशेष म्हणजे भोजनाची व्यवस्था दिवसाच्या वेळेनुसार केली जाते -
चहा/कॉफी सेवा : चहा किंवा कॉफीसोबत बिस्किटं, साखर किंवा शुगर फ्री पॅकेट्स आणि मिल्क क्रीमर असतील.
नाश्ता किंवा संध्याकाळचा चहा : चार ब्रेड स्लाइस (पांढरे किंवा तपकिरी), लोणी, फळांचे पेय (२०० मिली) आणि चहा किंवा कॉफी.
दुपारचे किंवा रात्रीचे जेवण: यात पिवळी डाळ, राजमा किंवा चणे, लोणच्याची पाकिटे किंवा तांदळाबरोबर मिश्र भाजी आणि पुरीसोबत लोणच्याची पाकिटे यांचा समावेश असेल.
वेळेत आपल्या गंतव्यस्थानी पोहोचण्यासाठी प्रवासी या प्रीमियम गाड्यांना जास्तीत जास्त प्राधान्य देतात. मात्र आता या गाड्या उशिराने धावत असतील तर प्रवाशांना मोफत जेवण मिळणार आहे, अशी तरतूद करण्यात आली आहे. नाश्ता, दुपारचे जेवण, संध्याकाळचा स्नॅक, डिनर अशा विविध पर्यायांमधून प्रवासी निवडू शकतात.