अनेक दशकापासून अनेक लोकप्रतिनिधीनी केलेल्या पाठपुराव्यानंतर आणि बीडच्या नागरिकांच्या अथक प्रयत्नानंतर बीडकरांचं मोठं स्वप्न प्रत्यक्षात उतरतय. गेल्या अनेक वर्षांपासून बीडच्या रेल्वेसाठी प्रयत्न सुरु होते. अहमदनगर – बीड – परळी रेल्वे मार्गाचे काम वेगाने सुरु होतं. रेल्वे अर्थसंकल्पात यासाठी 275 कोटी निधीची तरतूद केलेली होती. मध्य रेल्वेचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. नगर-बीड-परळी रेल्वे मार्ग एकूण 261.25 किलोमीटर लांबीचा आहे.
अहिल्यानगर बीड रेल्वेचा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ झाला. याच दरम्यान विविध पक्षातील कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा फोटो दाखवत मुंडे समर्थकांनी मुंडे साहेब अमर रहेच्या घोषणा दिल्या.
अखेर बीड-अहिल्यानगर रेल्वे मार्गावर पहिल्यांदा रेल्वे धावली. मंत्री महोदयांनी हिरवी झेंडी दाखवली अन् रेल्वेतून प्रवास करणाऱ्यांनी फोटो, व्हिडिओसह आनंद साजरा केला. पहिल्याच दिवशी प्रवाशांनी बीड ते अहिल्यानगर प्रवासासाठी मार्गक्रमण केले. बीड-अहिल्यानगर-परळी मार्गावर ही रेल्वे धावणार असून पहिल्या टप्प्यात आज बीड ते अहिल्यानगर या 167 किमी मार्गावर बीडकरांचा प्रवास सुरू झाला आहे.
त्यामुळे, बीड ते अहिल्यानगर रेल्वेने बीडकरांना प्रवास करता येईल, विशेष म्हणजे या प्रवासाचे तिकीटदरही समोर आले असून कमीत कमी 10 रुपये ते जास्तीत जास्त 40 रुपयांपर्यंतचे तिकीट दर आकारण्यात येणार आहेत. म्हणजेच, बीडहून केवळ 40 रुपयांत अहिल्यानगरला जाता येईल. बीड ते अहिल्यानगर या रेल्वे प्रवासात एकूण 15 रेल्वे स्थानक असणार आहे. पहिले स्टेशन राजुरी नवगण असून बीडवरुन फक्त 10 रुपयांत येथे जाता येईल. अहिल्यानगर-बीड-परळी हा संपूर्ण रेल्वेमार्ग 261 किमीचा आहे. त्यापैकी, आज फक्त बीड-अहिल्यानगर या 166 किमी मार्गाचा टप्पा प्रवाशांसाठी सुरू करण्यात आला आहे. उर्वरीत बीड-परळी टप्प्यातील काम अद्याप बाकी आहे.
बीड ते अहिल्यानग असा 167 किमीचे अंतर ही रेल्वे कापणार आहे. त्यामध्ये बीडसह एकूण १५ स्थानकांचा समावेश आहे.
बीड - रायमोह - रायमोहा - विघनवाडी - जाटनांदूर - अळमनेर - हतोला - वेताळवाडी - न्यू आष्टी - कडा - न्यू धानोरा - सोलापूरवाडी - न्यू लोणी - नारायणडोहो - अहिल्यानगर