बीड : बीडच्या गेवराई तालुक्यातील एका गावामध्ये गोठ्यात बांधून ठेवलेल्या गतिमंद मुलीची एका महिलेच्या जागरुकतेमुळे सुटका झाली. सध्या या मुलीला छत्रपती संभाजीनगर येथील पुनर्वसन केंद्रात दाखल करण्यात आलं आहे.
मिळालेलया माहितीनुसार , या मुलीच्या आईचा मृत्यू झालेला असून वडील व्यसनाधीन आहेत. मुलगी गतिमंद असल्यानं तिच्या वडिलांनी तिला चक्क जनावरांच्या गोठ्यामध्ये पायाला दोरी बांधून ठेवलं होतं. गंभीर बाब म्हणजे तिला खाण्यासाठी केळी आणि टरबुजाच्या साली दिल्या जायच्या. तिच्या घराशेजारी राहण्यासाठी आलेल्या एका महिलेनं या मुलीच्या रडण्याचा आवाज ऐकून ही परिस्थिती पाहिली.
त्यांना या मुलीची दया आल्यानं त्यांनी तिची सुटका केली. तेथून तिला छत्रपती संभाजीनगर येथील अनाथालयात दाखल केलं असून त्या ठिकाणी आता तिचे समुपदेशन देखील करण्यात आलं. संभाजीनगर येथील दामिनी पथकाच्या सहकार्याने हे सर्व कारवाही करण्यात आली. महिलेची जागरूकता आणि पोलीस कर्मचाऱ्यांची तत्परता यामुळे या मुलीची सुटका होऊ शकली.