बीड जिल्ह्यात रोज काहीतरी नव्या घटना घडताना दिसत आहेत. येथील शिरुरमध्ये अल्पवयीन मुलीचे अपहरण करत हातपाय बांधून शेतात टाकलं. दरम्यान, मुलीचा विनयभंग केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तसंच, मुलीच्या आई वडिलांनीही गंभीर आरोप केले आहेत.
या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार , बीडच्या शिरुर कासार तालुक्यातील वडाळी गावामध्ये अल्पवयीन मुलीचे घराजवळून अपहरण करत तिचे हातपाय बांधून शेतात टाकून दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
गंभीर बाब म्हणजे गतवर्षी देखील दोन वेळा असाच प्रकार घडला होता. त्यावेळी देखील पालकांनी तक्रार केली होती, परंतु, पोलिसांकडून कोणतीही कारवाई न झाल्याने तिसर्यांदा हा प्रकार घडला.
ही मुलगी घराच्या पाठीमागील बाजुस थांबलेली असताना समोरुन आलेल्या दोघांनी तिच्या तोंडावर स्प्रे मारला. यानंतर तिला गुंगी आल्यासारखे झाले. त्यानंतर त्या दोघांनी तिला ओढत नेवून जवळच्या शेतात बांधून टाकल्याचं तसंच तिचा विनयभंग देखील करण्यात आल्याचं समोर आलं आहे.
आता या प्रकरणात देखील दोन अनोळखी व्यक्तींच्या विरोधात शिरुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किमान आता तरी पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करावा अशी मागणी पालकांनी केली आहे.
मात्र, बीडमधील या प्रकारानंतर संताप व्यक्त केला जातोय. पोलिसांनी दोन वेळा मुलीचे अपहरण झाल्यानंतर कारवाई का केली नाही, पोलिसांवर नेमका कोणाचा दबाव आहे, असे असंख्य प्रश्न यादरम्यान उपस्थित केले जात आहेत.