नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी) :- हरिद्वार येथे यात्रेसाठी जात असलेल्या उल्हासनगर, कल्याण येथील व्यापाऱ्याचा रेल्वेमध्ये चढताना हात घसरून पडून दुर्दैवी मृत्यू झाला. लोहमार्ग पोलिसात याबाबत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कल्याण उल्हासनगर- 4 येथील व्यापारी हरेश खेमचंद उदासी (वय 55), त्यांची पत्नी मेनका हरेश उदासी (वय 49) व हीरेन हरेश उदासी (वय 21) तसेच त्यांचे इतर 18 नातेवाईक आज सकाळी आठ वाजता कल्याण येथून हरिद्वारकडे जाण्यासाठी हरिद्वार एक्सप्रेसने प्रवासासाठी निघाले.
नाशिकरोड रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्म नंबर दोनवर सकाळी 11 वाजेच्या सुमारास गाडी थांबली. त्यावेळी हरेश उदासी हे पाण्याची बाटली घेण्यासाठी गाडीखाली उतरले. पाण्याची बाटली घेतल्यानंतर गाडी सुरू झाली, त्यावेळी ते पळत जाऊन गाडी पकडण्याचा प्रयत्न उदासी करीत असताना त्यांचा हात सटकला व ते प्लॅटफॉर्म व पटरीच्या मध्यभागी पडले.
गाडी व प्लॅटफॉर्मचा जबरदस्त झटका बसल्याने त्यांच्या डोक्याला, हाताला, छातीला गंभीर इजा झाली. या घटने नंतर इतर प्रवाशांनी आरडाओरड केली. काही अंतरावर गेल्यानंतर गाडी पुन्हा थांबली. हरेश उदासी यांना रेल्वे पटरी वरून प्लॅटफॉर्मवर काढण्यात आले. त्यांना तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र दुर्दैवाने त्यांचा यात मृत्यू झाला.
आज सकाळीच मुंबईकडून नाशिककडे येणाऱ्या पुष्पक एक्सप्रेस व लोकल ट्रेन मध्ये झालेल्या अपघातात 6 प्रवासी पडून त्यांचा मृत्यू झाल्याची घटना मुंब्रा जवळ घडली. या घटनेनंतर काही वेळातच नाशिक रोड रेल्वे स्थानकात गाडीतून गाडी चढताना प्रवाशाला आपला जीव गमवावा लागला.
चालती गाडी पकडणे धोकादायक असल्याचे रेल्वे प्रशासन कडून नियमित कळवले जाते. त्याबाबतचे फलकही लावलेले जातात. मात्र प्रवासी निष्काळजीपणा करून आपला जीव धोक्यात टाकतात. रेल्वे प्रशासन प्रवासादरम्यान ज्या सूचना करतात त्याचं पालन करणे आवश्यक असल्याचे लोहमार्ग पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक सचिन बनकर यांनी सांगितले.