बहुचर्चित माझी लाडकी बहीण योजनेवरून सध्या राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापले आहे. पुन्हा एकदा लाडक्या बहीण योजनेवरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. दरम्यान आता लाडकी बहीण योजनेवरून निर्माण झालेल्या वादावर अदिती तटकरेंनी सप्ष्टीकरण दिले आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून सुमारे 80 लाख महिलांची नावे वगळण्यात आल्याचा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केल्यानंतर राज्यातील राजकारण तापले आहे. या आरोपांना उत्तर देताना महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी महत्त्वाचे स्पष्टीकरण दिले आहे. माध्यमांशी संवाद साधताना तटकरे म्हणाल्या की, लाडकी बहीण योजनेतील अर्ज बाद करण्यात आलेले नाहीत. लाभार्थ्यांची पडताळणी आणि ई-केवायसी प्रक्रिया सुरू असल्याने काही नोंदींची तपासणी करण्यात येत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असून, ई-केवायसी प्रक्रिया मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात सुरू करण्यात आली होती. यासाठी लाभार्थ्यांना सुमारे तीन महिन्यांचा कालावधी देण्यात आला होता.
तटकरे यांनी स्पष्ट केले की, ई-केवायसी ही प्रक्रिया केवळ लाडकी बहीण योजनेसाठी नसून राज्यातील विविध डीबीटी (Direct Benefit Transfer) योजनांमध्येही राबवली जाते. तसेच 80 लाखांचा आकडा केवळ ई-केवायसी न केलेल्या लाभार्थ्यांचा नसून त्यामध्ये इतर निकषांमुळे अपात्र ठरणाऱ्या महिलांचाही समावेश आहे. यामध्ये वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त असलेल्या लाभार्थ्यांची पडताळणी, वयोमर्यादेच्या निकषात न बसणाऱ्या महिला आणि सरकारी कर्मचारी यांचा देखील समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. सरकारी कर्मचाऱ्यांकडून लाभाची रक्कम परत वसूल करण्याची प्रक्रिया गेल्या आठ महिन्यांपासून सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली.