सध्या राज्यात लाडकी बहीण योजना चर्चेत आहे ती अपात्र ठरलेल्या महिलांमुळे. कारण सध्या हा मुद्दा तापला असून यावरून जोरदार आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. दरम्यान आता मात्र लाडक्या बहिणींसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार , योजनेचा लाभ घेतलेल्या परंतु ई-केवायसी करू न शकणाऱ्या,पडताळणीत अपात्र ठरलेल्या महिलांचे नावा लाभार्थी यादीतून काढून टाकण्यात आले आहे. त्यामुळे आता लाखो लाडक्या बहिणींना पैसे मिळत नाहीयेत. दरम्यान, आता काही महिला तांत्रिक कारणांमुळे ई-केवायसी करू शकलेल्या नाहीत. म्हणूनच पुन्हा एकदा आम्हाला ई-केवायसी करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी महिलांकडून केली जात आहे. याच मागणीवर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट भाष्य केले आहे. त्यांनी लाडक्या बहिणींना एका प्रकारा अप्रत्यक्षपणे खुशखबरच दिली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार बांधवांशी संवाद साधला. यावेळी फडणवीस यांना अनेक महत्त्वाचे प्रश्न विचारण्यात आले. अनेक लाभार्थी महिलांची नावे लाडकी बहीण योजनेतून हटवण्यात आलेली आहेत. यावर विचारले असता, ज्यांनी केवायसी केलेली नाही, ते लोक या योजनेच्या पात्रतेचे निकष पूर्ण करताना दिसत नाहीत. हा आकडा 60 लाख, 80 लाख आहेत. ज्यांनी ई-केवायसी केलेली नाही, त्यांना आम्ही पैसे देणार नाही, अशी मोठी माहिती फडणवीस यांनी दिली. तसेच ज्या लाडक्या बहिणी पात्र नसतानाही त्यांनी याआधी लाभ घेतला असेल तर त्या लाडक्या बहिणींकडून आम्ही पैसे वसूलही करणार नाही, असेही फडणवीस यांनी सांगितले. ज्या 14 हजार पुरुषांनी पैसे घेतलेले आहेत. त्यांच्याकडून मात्र पैसे वसूल केले जाणार असल्याचे ते म्हणाले.
तसेच, लवकरच ई-केवायसी करण्यासाठी पर्याय उपलब्ध करून दिला जाऊ शकतो, असे संकेत फडणवीस यांनी दिले आहेत. पात्र असलेल्या महिला असतील परंतु त्यांची केवायसी पूर्ण झालेली नसेल तर पुन्हा ई-केवायसी करण्याची तयारी असणाऱ्या महिलांसाठी आम्ही पुन्हा एकदा ई-केवायसीची विंडो ओपन करायला तयार आहोत. त्या महिलांना लाभ द्यायला तयार आहोत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले..