नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) साधुग्राम करता १५०० एकर जागा कायमस्वरूपी आरक्षित करण्याची मागणी महंत राजेंद्रदास महाराज यांनी केली आहे. पंचवटी तपोवन येथे आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तपोवन परिसरातील मकवाना भवन येथे नाशिकच्या तीनही आखाड्यातील महंतांच्या उपस्थितीत आज सायंकाळी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी बोलताना राजेंद्रदास महाराज म्हणाले, अनादी काळापासून कुंभमेळ्याची परंपरा सुरू आहे. तीन आखाड्यांच्या अंतर्गत पुर्वी ४०० खालसे होते. आता त्यांची संख्या अकराशे पर्यंत पोहोचली आहे. विशेष म्हणजे भविष्यात या खालस्यांची संख्या वाढणार असल्याने प्रशासनाने तपोवन व जवळच्या परिसरात पंधराशे एकर जागा आरक्षित करावी. तसेच सिंहस्थ कुंभमेळ्यात मुख्य तेरा आखाड्यांचा समावेश असतो, प्रशासनाने या तेरा आखाड्यांचा व्यतिरिक्त इतर कोणत्याही आखाड्यांबाबत विचार करू नये, असे देखील महंत राजेंद्रदास महाराज यांनी सांगितले.
दरम्यान प्रशासनाने कुंभमेळ्याची तयारी करताना रस्ते, पाणी यासह गोदावरीच्या प्रदूषणावर देखील काम करावे. प्रशासनाने नदी पात्रात मिसळणारे गटारीच्या पाण्याची स्वतंत्र पाईपलाईन करत गोदावरी प्रदुषण मुक्त करावी अशी मागणी या पत्रकार परिषदेत करण्यात आली. यावेळी अयोध्या येथून मुरलीधरदास महाराज, महानुपालदास महाराज, रामानंद महाराज, मोहनदास महाराज, शामसुंदरदास महाराज, दिगंबर आखाड्याचे रामकिशोरदास शास्त्री, महंत भक्तिचरणदास, पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीष शुक्ल आदी साधुसंत, महंत व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.