एका तेरा वर्षीय शाळकरी मुलीचा विहिरीत बुडून मृत्यू झाला असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सविता शिवाजी भोये (वय १३) असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. सुरगाणा तालुक्यातील करंजाळी येथील तेरा वर्षीय मुलीचा विहिरीतबुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार , सविताच्या घराजवळ ठक्कर बाप्पा योजनेच्या विहिरीचे सुमारे चार वर्षांपासून बांधकाम ठेकेदारामार्फत सुरू आहे. सबंधित ठेकेदाराला ग्रामस्थांनी वारंवार सूचना देऊन ही विहिरीचे बांधकाम करीत नाहीत विहीर सविताच्या घराजवळ असल्याने सविता शेतात जात असतांना पाय घसरून विहिरीत पडल्याने तिचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.
दरम्यान, विहीर खोल असल्याने पोहणाऱ्या पाणबुड्यांनी तिचे शव बाहेर काढले. यानंतर तिला सुरगाणा येथील ग्रामीण रुग्णालयात तात्काळ उपचारासाठी दाखल करण्यात आले. यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून तिला मृत घोषित केले. त्यानंतर शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
करंजाळी गावात सुमारे चार वर्षांपासून कळवण प्रकल्पामार्फत ठक्कर बाप्पा योजनेची विहीर फक्त खोदकाम करून ठेवली आहे. तिचे बांधकाम अद्याप पूर्ण न केल्याने माझ्या मुलीला जीव गमवावा लागला. यापूर्वी देखील अनेकवेळा गायी,बैल, जनावरे विहरीत पडले आहेत. अधिकाऱ्यांनी याची सखोल चौकशी करुन संबंधित हलगर्जीपणा करणाऱ्या ठेकेदारांवर कठोर कारवाई करावी.