वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर मराठा समाजाने घेतला ''हा'' ऐतिहासिक निर्णय
वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर मराठा समाजाने घेतला ''हा'' ऐतिहासिक निर्णय
img
नंदिनी मोरे
पुण्यातील  वैष्णवी हगवणे या विवाहितेने आत्महत्या केली. सासच्यांच्या जाचाला कंटाळून तिने ही आत्महत्या केल्या असल्याचा आरोप आहे. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. दरम्यान, या प्रकरणानंतर  मराठा समाजाने एक मोठा निर्णय घेतला आहे. 

आर्थिक सुबत्ता असतानाही वैष्णवीसारख्या निष्पाप मुलींचा हुंड्यासाठी छळ केला ही बाब समाजासाठी निंदनीय असल्याचं सांगत अशा पद्धतीने छळ करणाऱ्या कुटुंबीयांसोबत रोटी बेटी व्यवहार न करण्याचा मोठा निर्णय सकल मराठा समाजाच्या वतीने घेण्यात आलाय.

वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणासारखी दुसरी घटना पुन्हा घडू नये त्यासाठी, अशा पद्धतीचा कठोर निर्णय घेण्याची वेळ समाजावर आली असल्याचे मान्यवरांनी सांगितले. त्यामुळे पुढील काळात मराठा समाजाने कोणताही बडेजाव न मिरवता आणि अनाठायी खर्च टाळून अत्यंत साध्या पद्धतीने लग्न सोहळे करावीत, असे आवाहन देखील समाजातील धुरीणांनी केले आहे.

इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे, मराठा नेते भाऊसाहेब भोईर, संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष अभिमन्यू पवार, माजी आमदार विलास लांडे अशा समाजातील महत्त्वाच्या मान्यवरांची बैठक पार पडली. या बैठकीत समाजातील लग्नांमधील अनाठायी खर्च आणि हुंड्यासारख्या प्रथेबाबत चर्चा करण्यात आली.

आर्थिक परिस्थिती चांगली असतानाही केवळ हुंड्यासाठी निष्पाप मुलींचा छळ केला जात असेल तर समाजाने त्यांच्याशी कोणत्याही प्रकारचा रोटी बेटी व्यवहार ठेवू नये, असा ऐतिहासिक निर्णय बैठकीत एकमुखाने घेण्यात आला. मराठा समाजाला मोठा इतिहास आहे. परंतु हुंड्यासारख्या कुप्रथेचा डाग जेव्हा समाजावर लागतो, तेव्हा समाज म्हणून मोठे नुकसान होते. तेव्हा समाजातील कुणीही हुंडा देऊ नये आणि घेऊही नये, असा निर्णय घेण्यात आला.

समाजात विवाहसोहळे करताना अनाठायी खर्चाला फाटा दिला पाहिजे तसेच कोणताही बडेजाव न करता लग्नसोहळे केले पाहिजेत, अशी अपेक्षा समाजातील मान्यवरांनी केली आहे. मराठा समाजाने घेतलेल्या या निर्णयाचे नक्की काय पडसाद उमटतात याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. मात्र आज घेतलेल्या सर्व निर्णयावर समाज कायम राहील, असा विश्वास नेत्यांनी व्यक्त केला.
इतर बातम्या
Join Whatsapp Group