मुंबई : गेल्या दीड महिन्यांपासून उद्धव आणि राज ठाकरे यांच्या मनोमिलनाच्या चर्चा सुरु आहेत. आदित्य आणि राज ठाकरे यांनी देखील याबद्दल सकारात्मक विधानं केली आहेत. ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येणार असल्याच्या चर्चांबद्दल उद्धव यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर महाराष्ट्राच्या मनात जे आहे, ते होईल, असं सूचक विधान ठाकरेंनी केलं.
तुम्ही याबद्दल दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना काय संदेश देऊ इच्छिता, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर संदेश कशाला, मी थेट बातमीच देईन, असं म्हणत उद्धव यांनी राज ठाकरेंच्या मनसेसोबत युती करण्याचे स्पष्ट संकेत दिले. ते मातोश्रीवर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
उद्धव आणि राज ठाकरे यांचं मनोमिलन होणार का, याची उत्सुकता राजकीय वर्तुळासह संपूर्ण राज्याला आहे.
गेल्या दीड महिन्यांपासून याबद्दलच्या चर्चा सुरु आहेत. आमच्या मतभेदांपेक्षा, वादापेक्षा महाराष्ट्र मोठा नाही, असं राज ठाकरे एप्रिलच्या अखेरीस दिलेल्या एका मुलाखतीत म्हणाले होते.
त्यावर आमच्यात वाद, भांडणं नव्हतीच. जर असलीच, तर ती आज संपली, असं म्हणत उद्धव यांनी राज ठाकरे यांना सकारात्मक प्रतिसाद दिला होता. यानंतर शिवसेना उबाठा आणि मनसे यांच्या मनोमिलनच्या चर्चेनं जोर धरला.