मुंबईत पुन्हा एकदा मराठी-अमराठीचा मुद्दा जोरदार तापला आहे. मीरा भाईंदरमध्ये एका अमराठी व्यापाऱ्याच्या कानशिलात लगावल्यानंतर व्यापाऱ्यांनी मोर्चा काढून मीरा भाईंदर बंद पुकारला.
मात्र, मनसेनेही उत्तर म्हणून मोर्चा काढण्याचा निर्णय जाहीर केला. पण पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली. एवढंच नव्हे तर पोलिसांनी मनसे नेत्यांची मध्यरात्री धरपकड करून त्यांना ताब्यात घेतलं. त्यामुळे मनसे कार्यकर्ते आणि सामान्य लोक संतापले असून रस्त्यावर उतरले आहेत.
मनसे कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून निषेध करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे मनसे पुन्हा एकदा खळखट्ट्याक मोडवर जात असल्याचं चिन्ह दिसत आहे. तर दुसरीकडे मीरा भाईंदरमध्ये पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात असून आंदोलनकर्त्यांना अडवलं जात आहे. त्यामुळे मीरा भाईंदरमधील वातावरण चांगलंच तापलं आहे.
मराठीच्या मुद्यासाठी जमलेल्या लोकांची पोलिसांकडून धरपकड सुरु आहे. तसेच आंदोलन करणाऱ्या अनेक महिलांनांही ताब्यात घेण्यात आलं असून पोलिस त्यांना जबरदस्तीने व्हॅनमध्ये बसवत आहे.
व्यापाऱ्यांच्या मोर्चावेळी कायदा का नाही ? अमराठी लोकांच्या मोर्चाला परवानगी दिली मग आम्हाला का नाही ? सरकारची मराठी माणसावरच कारवाई का ? असे अनेक सवाल येथे जमलेल्या लोकांकडून उपस्थित केले जात आहेत. मराठी एकजुटीचा विजय असो, महाराष्ट्र सरकार हाय हाय अशा घोषणा दिल्या जात असून वातावरण पूर्णपणे तापलेलं आहे.
मिरा रोड प्रकरणी मनसेचे नेते संदीप देशपांडे 11 वाजता राज ठाकरेंची शिवतीर्थ येथे भेट घेणार आहेत. आणि या विषयावर चर्चा करतील. मिरा रोड पोलिसांकडून सुरू असलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर मुंबई ठाण्यातील मनसेचे पदाधिकारी मिरा रोड येथे पोहोचत आहेत.
दरम्यान मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख हे आंदोलन स्थळी पोहोचण्या अगोदरच त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.