राज्यात उष्णतेची लाट! राज ठाकरेंचे सरकारला पत्र ;  केली 'ही' मागणी...
राज्यात उष्णतेची लाट! राज ठाकरेंचे सरकारला पत्र ; केली 'ही' मागणी...
img
Dipali Ghadwaje
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील तापमानात चांगलीच वाढ होत आहे. दिवसेंदिवस तापमान अधिकच वाढत असल्यानं नागरिकांना उन्हाचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. राज्यातील तापमान दिवसेंदिवस वाढत चालले आहे. कडाक्याचे ऊन आणि वाढती उष्णता यामुळे नागरिक हैराण झाले आहे. उकाड्यामुळे अंगाची लाही लाही होत आहे. अशामध्ये राज्यातील तापमान आणखी वाढण्याची शक्यता आहे. 

हवामान खात्याने राज्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता देखील वर्तवली आहे. वाढती उष्णता लक्षात घेता नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन सरकारकडून केले जात आहे. अशामध्ये राज्यातील उष्णतेच्या लाटेचा मुद्दा लक्षात घेता मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारला  पत्र लिहिले आहे. या पत्राद्वारे त्यांनी सरकारला शाळांना आत्ताच उन्हाळी सुट्टी जाहीर करण्याची मागणी केली आहे.

काय लिहिलंय पत्रात ?

राज ठाकरे यांनी सरकारला लिहिलेल्या पत्रात असे म्हटले आहे की, 'गेले काही दिवस मुंबई, ठाणे जिल्हा, पालघर जिल्हा, कोकण ह्या भागात दिवसाचं सरासरी तापमान हे जवळपास ४० अंशांपर्यंत गेलं आहे. अर्थात उर्वरित महाराष्ट्रात पण काही वेगळी स्थिती नाहीये. उष्णतेची लाट आली आहे असं जाहीर झालं आहे. मुळात अशी लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने आधीच का नोंदवली नाही?, हा मुद्दा आहे. असो.', असे म्हणत राज ठाकरे यांनी हवामान खात्याने आधीच उष्णतेची लाट येण्याची कल्पना का नाही दिली असा सवाल उपस्थित केला आहे.

राज्यातील उष्णतेची लाट लक्षात घेता त्यांनी शाळांना उन्हाळी सुट्टी जाहीर करण्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. त्यांनी असे म्हटले आहे की, 'अशा परिस्थितीत लहान मुलांच्या शाळांच्या उन्हाळी सुट्ट्या सुरु व्हायला अजून काही काळ असल्यामुळे त्यांना शाळेत जावं लागत आहे. ह्याबाबतीत जरी आचारसंहिता असली, तरी सरकारने शाळांना आत्ताच उन्हाळी सुट्टी जाहीर करण्याचे निर्देश देण्याची तजवीज करायला हवी. तसंच उन्हाळ्याचा दीर्घकाळ शिल्लक आहे. त्यामुळे हवामानात काय बदल होऊ शकतील ह्याचे अचूक अंदाज आले तर एकूणच लोकांना त्यांच्या कामांचं नियोजन करता येईल.'

तसंच, राज ठाकरे यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना देखील कडाक्याच्या उन्हामध्ये नागरिकांना मदत करण्याचे आवाहन केले आहे. पुढे त्यांनी असे लिहिले की, 'माझी माझ्या महाराष्ट्र सैनिकांना पण विनंती आहे की, तुम्ही पण उष्णतेच्या लाटेत स्वतःची काळजी घ्या. तसंच ह्या भीषण उन्हाळ्यात सगळ्यात जास्त हाल होतात प्राण्यांचे आणि पक्षांचे आणि निराधार आणि बेघर लोकांचे. त्यांना प्यायला स्वच्छ पाणी मिळेल ह्याची तजवीज करा. आणि प्राणी आणि पक्षी तर बिचारे पाणी मागू शकत नाहीत, त्यामुळे, त्यांना सहज पाणी मिळेल आणि सहज पिता येईल अशापद्धतीने गॅलरीत, गच्चीत पाणी ठेवा.', असे आवाहन त्यांनी नागरिकांसह मनसे कार्यकर्त्यांना केली आहे.

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group