माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे नेते, तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर जोरदार हल्ला चढवला होता. उद्धव ठाकरे यांच्या या टीकेचा शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.
उद्धव ठाकरे यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. उद्धव ठाकरे यांना चांगल्या डॉक्टरच्या उपचाराची गरज आहे, असा हल्ला चढवतानाच एकनाथ शिंदेंना रुसूबाई रुसू गावात जाऊन बसू म्हणता? मग तुम्ही सारखं सारखं लंडनला का जाता? असा संतप्त सवाल रामदास कदम यांनी विचारला आहे.
रामदास कदम यांनी टीव्ही9 मराठीशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवत त्यांच्या भाषणाचं पोस्टमार्टेमच केलं. उद्धव ठाकरे यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे. त्यांना चांगल्या डॉक्टरची आवश्यकता आहे. त्यांना नियतीने धडा शिकवला आहे. त्यांनी या निवडणुकीत 90 उमेदवार उभे केले होते. फक्त उमेदवार 20 निवडून आले. तेही राहतील की नाही अशी शंका निर्माण झाली आहे. त्यामुळेच उद्धव ठाकरे यांना वैफल्य आलं आहे. त्यातूनच त्यांची बडबड सुरू आहे, असा हल्लाबोलच रामदास कदम यांनी केला आहे.
लंडनला का जाता ?
रुसूबाई रुसू आणि गावात जाऊन बसू असं उद्धव ठाकरे हे एकनााथ शिंदे यांना उद्देशून म्हणाले. एकनाथ शिंदे शेतकऱ्यांचा मुलगा आहेत. त्यामुळे ते गावाला जातात, शेती करतात. पण उद्धवजी आपण लंडनला कशासाठी जाता? महाराष्ट्रातील मिठाईचे खोके गोळा करून घेऊ आणि लंडनला बसू, असं काही आहे का तुमचं? असा सवाल रामदास कदम यांनी केला.
एकनाथ शिंदे सक्षम आहेत. त्यांनी 80 उमेदवार उभे केले आणि 60 आमदार निवडून आणले. त्यामुळेच आता उद्धव ठाकरेंनी थांबायला हवं. आत्मपरीक्षण केलं पाहिजे. उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी बेईमानी केली. शिवसेनाप्रमुखांनी शेवटपर्यंत कोणतंही पद घेतलं नाही. शिवसेनाप्रमुख मुख्यमंत्री होऊ शकले नसते? त्यांनी मनोहर जोशींना लोकसभेचे अध्यक्ष केलं.
बाळासाहेब लोकसभेचे अध्यक्ष होऊ शकले नसते? झाले असते ना. पण त्यांनी रिमोट कंट्रोल आपल्या हाती ठेवला. उद्धव ठाकरे स्वार्थी आहेत. त्यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं. त्यांना वर्षा बंगल्यावर जाऊन बसण्याची घाई होती. म्हणून शिवसेना फुटली. कशाला एकनाथ शिंदेंना दोष देता. तुमचं आत्मपरीक्षण करा. तुम्ही काय केलं? तुम्ही बाळासाहेबांच्या विचारांशी बेईमानी केली. त्यांचं नाव घेण्याचा अधिकार आहे का तुम्हाला? एकनाथ शिंदेंनी कर्तृत्व सिद्ध केलं आहे. जनतेने शिक्कामोर्तब केलं की शिंदेंची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे, असंही रामदास कदम म्हणाले.
तोंडाची बडबड केली तर माणूस मोठा होत नाही. कृतीने मोठा होत असतो. लोक वैतागले आहेत. उद्धव ठाकरेंकडे बडबडीशिवाय काही नाही. एकनाथ शिंदे यांना गाडायला तुम्हाला अजून 100 जन्म घ्यावे लागतील. तुम्ही बेईमान आहात. गद्दार आहात. तुम्हाला एकनाथ शिंदेंना गद्दार म्हणण्याची गरज नाही, असंही ते म्हणाले.