अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणावर देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणावर देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
img
Dipali Ghadwaje
मुंबई : बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा मुंब्रा बायपास रोडवर पोलीस चकमकीत मृत्यू झाला होता. अक्षय शिंदे याने पोलिसांकडील पिस्तुल हिसकावून तीन गोळ्या झाडल्या. यामध्ये एक पोलीस कर्मचारी जखमी झाला होता. त्यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात अक्षय शिंदे ठार झाला होता.

या एन्काऊंटरबाबत राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस  यांनी रोखठोक मत मांडत पोलिसांच्या कृतीचे समर्थन केले आहे. एखाद्याने हल्ला केला तर पोलीस टाळ्या वाजवत बसणार नाही, असे त्यांनी म्हटले . 


नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

देवेंद्र फडणवीस यांना अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणात उपस्थित करण्यात आलेल्या आरोपांविषयी विचारणा करण्यात आली. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, एखाद्या गुन्हेगाराचा एन्काउंटर व्हावा, या मताचे आम्ही देखील नाही. मला व्यक्तिश: कोणत्याही गुन्हेगारी प्रकरणात कायद्याचे पालन व्हावे, असे वाटते. कायद्याच्या माध्यमातूनच गुन्हेगाराला शासन झाले पाहिजे. ही सगळी प्रक्रिया वेगाने पार पडली पाहिजे. अक्षय शिंदे याचा मृत्यू पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात झाला. आमचे पोलीस एखाद्याने हल्ला केल्यावर टाळ्या वाजवत बसणार नाहीत, असे देवेंद्र फडणवीस यांनी ठणकावून सांगितले.

अक्षय शिंदे याच्या एन्काउंटरनंतर मुंबई, ठाणे आणि बदलापूर परिसरात अनेक ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांच्या अभिनंदनाचे बॅनर्स लागले होते. या बॅनर्सवर 'बदला पुरा', 'देवाचा न्याय', 'देवाभाऊ सुपरफास्ट' अशा उपाध्या देऊन देवेंद्र फडणवीस यांचा गृहमंत्री म्हणून गौरव करण्यात आला होता.

याविषयी देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता त्यांनी म्हटले की, हा प्रकार अयोग्य आहे. एन्काउंटरसारख्या घटनेचे उदात्तीकरण कधीच होता कामा नये, असे फडणवीसांनी म्हटले. या एन्काउंटरची गुन्हे अन्वेषण विभागाकडून  नि्ष्पक्ष चौकशी होईल, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
इतर बातम्या
Join Whatsapp Group