राजकीय ! मुख्यमंत्र्यांविरोधात काँग्रेस हक्कभंग आणणार, नेमकं काय म्हणाले  नाना पटोले ?
राजकीय ! मुख्यमंत्र्यांविरोधात काँग्रेस हक्कभंग आणणार, नेमकं काय म्हणाले नाना पटोले ?
img
दैनिक भ्रमर
राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले असून विधानसभा निवडणुकीनंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांत सातत्याने  आरोप प्रत्यारोप सुरु असून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एक घोषणा केली आहे त्यामुळे राजकीय वर्तुळातील घडामोडींना वेग आला आहे. 

परभणी येथील सोमनाथ सुर्यवंशी यांच्या मृत्यूला पोलीस जबाबदार नाहीत तर मग सरकार त्यांना निलंबित का करत आहे? असा प्रश्न विचारून फक्त निलंबित करून चालणार नाही तर त्यांना बडतर्फ केले पाहिजे. विधानसभेत खोटी माहिती देणाऱ्या मुख्यमंत्र्यांविरोधात काँग्रेस हक्कभंग आणणार आहे, अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.

परभणी व बीड प्रकरणी पोलिसांच्या मदतीने लोकांचे जीव घेतले गेले. परभणीतील आंबेडकरी अनुयायी सोमनाथ सुर्यवंशी यांची हत्या पोलिसांच्या मारहणीमुळेच झाल्याचे स्पष्ट झालेले आहे. सुर्यवंशी यांचा मृत्यू दम्याच्या आजाराने झाला अशी खोटी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी नागपूर अधिवेशनात देऊन सभागृहाची दिशाभूल केली. त्यांच्याविरोधात आम्ही हक्कभंग आणणार आहोत, असे नाना पटोले यांनी दिल्लीत माध्यमांशी बोलताना सांगितले.

संविधानाच्या विटंबनेनंतर परभणीत कोंबिंग ऑपरेशन करून निरपराध लोकांना बेदम मारहाण करण्यात आली. या कोंबिंग ऑपरेशनचे आदेश कोणी दिले? मंत्रालय व पोलीस महासंचालक कार्यालयातून आदेश दिले गेले का? याची चौकशी करून कोंबिंग ॲापरेशन करणारे अधिकारी व त्यांना आदेश देणाऱ्यांवरही कठोर कारवाई करावी, अशी मागणी पटोले यांनी केली.
सोमनाथ सुर्यवंशी या निरपराध सुशिक्षित तरुणाचा मृत्यू पोलीस मारहाणीमुळेच झाल्याची पुष्टी शवविच्छेदन अहवालानेही केली असताना राज्य सरकार अद्याप संबंधित पोलिसांना पाठीशी घालत आले आहे. सुर्यवंशी यांचा मृत्यू दम्याच्या आजाराने झाला अशी खोटी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी नागपूर अधिवेशनात देऊन सभागृहाची दिशाभूल केली. आता सरकार याच प्रकरणी पोलिसांवर निलंबनाची कारवाई करत आहे. पण सरकारने संबंधितांना बडतर्फ करावे, असे पटोले म्हणाले.

बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या व परभणीतील सोमनाथ सुर्यवंशी यांची हत्या या अत्यंत गंभीर घटना आहेत. दोन्ही प्रकरणात सरकार चालढकल करत आहे. बीड प्रकरणात भाजपाचे आमदार सुरेश धस दररोज नवीन सनसनाटी आरोप करत आहेत. पण सरकार काहीच कारवाई करत नाही. यावरून हे सर्व ठरवून सुरु आहे असे दिसते. आता त्यांनी परभणी प्रकरणात पोलिसांना माफ करण्याची भाषा केली आहे. हा दुटप्पीपणा असून तो फक्त सुरेश धस यांचा नसून सरकारचा दुटप्पीपणा आहे. सरकार सुरेश धसांना बुजगावण्यासारखे उभे करून मुळ प्रश्नापासून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करत आहे, असेही नाना पटोले म्हणाले.
इतर बातम्या
Join Whatsapp Group