ठाकरे बंधूनंतर पवार कुटुंब एकत्र येणार का? याकडे राजकीय मंत्र्यांसह प्रत्येकांचं लक्ष आहे. अनेक बैठकांमध्ये पवार काका पुतणे एकत्र दिसले होते. पवार कुटुंबानेही काका पुतण्यामध्ये मनोमिलन व्हावे अशी इच्छा व्यक्त केली. पण अद्याप यावर कुणाकडून पुढाकार घेतलेला दिसून आलेलं नाही.

दरम्यान, खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत मोठा गौप्यस्फोट केला. "शरद पवार आणि अजित पवार एकत्र येऊ नयेत यासाठी राष्ट्रवादीतूनच दोन बड्या नेत्यांकडून विरोध होत आहे," असा गंभीर आरोप त्यांनी केला.
नेमकं काय म्हणाले संजय राऊत ?
'अजित पवार गटातील नेते अजूनही म्हणतात की शरद पवार हेच आमचे नेते आहेत. दोन्ही गटांमध्ये एकीबाबत चर्चा सुरू असते. पण वस्तुस्थिती अशी आहे की प्रत्येकजण आपापला फायदा, तोटा आणि राजकीय अस्तित्व पाहतो आहे', असं संजय राऊत म्हणाले.
संजय राऊत पुढे म्हणाले, 'शरद पवार यांच्या विचारधारेवर आम्ही चालतो, आम्हीच खरी राष्ट्रवादी, असे हे नेते म्हणतात. पण जेव्हा एकत्र येण्याची वेळ येते, तेव्हा तयार होत नाहीत. मोदी-शाह यांच्या मुख्य दुकानासोबत आपले छोटे दुकान चालवायचं आहे, जो तो आपला राजकीय फायदा - तोटा पाहत असतो', असं संजय राऊत म्हणाले.
तटकरे आणि पटेल यांच्यावर टीका करताना राऊत म्हणाले, 'प्रफुल्ल पटेल हे काही महान नेते नाहीत. तटकरे अध्यक्ष आहेत, पण एकत्र आलो तर अध्यक्ष बदलावा लागेल. मग तटकरे काय करणार? केंद्रातील मंत्रिपदाचा मुद्दाही आहे. सगळे आपापली सोय पाहत आहेत,' असा थेट आरोप त्यांनी केला.