जुलै ,महिन्यात संपूर्ण राज्यात पावसाने चांगलाच हाहाकार माजवला होता . राज्यात अनेक ठिकाणी पूरजन्य परिस्तिथी निर्माण झाली होती.परंतु आता हवामान विभागाच्या अंदाजाने संपूर्ण राज्याची चिंता वाढली आहे.
राज्यातील काही जिल्हे वगळता बहुतांशी भागात पावसाचा तुटवडा पहायला मिळत आहे. राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे. सध्या हवामान प्रणाली सक्रिय नसल्याने महाराष्ट्रात चांगल्या पावसाची शक्यता कमी झाली आहे. त्यामुळे आता आगामी काळात दुष्काळ सदृष्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये ऑगस्ट महिन्यात पावसाची मोठी तूट असल्याची माहिती हवामान तज्ज्ञ एस. डी. सानप यांनी दिली आहे. काही जिल्ह्यांमध्ये ही तूट 50 टक्क्यांपेक्षाही अधिक असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. जुलै महिन्यात काही प्रमाणात पावसाची तूट भरून निघाली होती. मात्र, ऑगस्टमध्ये परिस्थिती पुन्हा बदलली असून अनेक जिल्ह्यांमध्ये अपेक्षित पाऊस झालेला नाही. त्यामुळे पावसाच्या आकडेवारीत मोठी तफावत निर्माण झाली आहे.
ऑगस्ट महिन्यात नाशिक, पुणे आणि सातारा या जिल्ह्यांचा अपवाद वगळता राज्यातील अनेक भागांत पावसाची स्थिती गंभीर असल्याचे हवामान तज्ज्ञ एस. डी. सानप यांनी सांगितले. विशेषतः मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागांमध्ये पावसाचे प्रमाण कमी असल्याने या भागातील शेतीवर त्याचा थेट परिणाम होताना दिसत आहे. यामुळे थेट राज्याच्या अर्थव्यवस्थेवरही परिणाम होण्याची शक्यता आहे.
काही भागांत पिकांना आवश्यक पाणी मिळत नसल्याचे शेतीची अवस्था वाईट आहे. पावसाचे प्रमाण कमी राहिल्यास खरीप पिकांच्या वाढीवर आणि उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. महत्त्वाची बाब म्हणजे सध्या संपूर्ण महाराष्ट्रात सर्वदूर पाऊस पडेल, अशी अनुकूल हवामान परिस्थिती दिसत नसल्याचेही एस. डी. सानप यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता आगामी काळात राज्यातील काही जिल्ह्यांना दुष्काळाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.