गेल्या अनेक दिवसांपासूम राज्यातील राजकारणात मोठ्या हालचाली सुरु असून एकीकडे शिवसेना पक्ष आणि चिन्ह कोणाचा यावरून वाद सुरु असून दुसरीकडे मात्र आता उद्धव ठाकरेंसह अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसलं आहे.
राज्यभरातील विविध राजकीय पक्षांतील पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि प्रमुख कार्यकर्त्यांनी शिवसेनेचा भगवा हाती घेतल्याने पक्षाच्या संघटनविस्ताराला मोठे बळ मिळाले आहे. उबाठा गट, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष तसेच बहुजन हक्क अभियानाशी संबंधित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मंगळवारी (ता. १८) शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. नंदनवन या निवासस्थानी झालेल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वांचे शिवसेनेत स्वागत करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या पुढाकाराने बार्शी तालुक्यातील वैराग नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सुजाता डोळसे, उपनगराध्यक्ष निरंजन भूमकर यांच्यासह १३ नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. सांगोला विधानसभा मतदारसंघातील शेतकरी कामगार पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेससह अन्य पक्षांतील सुमारे २०० कार्यकर्त्यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. यामध्ये धायटीचे सरपंच पतथा पुरोगामी, तालुका अध्यक्ष रवीभाऊ मेटकरी, जिल्हा परिषद सभापती बंडू मोटे, मनोज ढोबळे यांच्यासह विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा समावेश आहे.
बार्शीतील उबाठा गटाचे माजी उपशहरप्रमुख दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बहुजन हक्क अभियानाचे बार्शी तालुकाध्यक्ष सचिन पालखे, श्रीकांत गायकवाड, दर्शन देशमुख, महिला अध्यक्ष बबिता मोकाशी यांच्यासह अनेक पदाधिकारी शिवसेनेत दाखल झाले. चंद्रपूर जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष पांडुरंग जाधव, जिवती नगर परिषदेचे नगरसेवक मारुती भुमरे यांच्यासह अनेक सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातही शिवसेनेच्या संघटनात्मक विस्ताराला बळ मिळाले आहे.