लोकसभा निवडणुकीसाठी शरद पवारांनी साताऱ्याचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्यासाठी प्रचार सभा घेतली. या प्रचारसभेत शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देवेंद्र फडणवीसांवरही टीका केली आहे. 'लोकसभेच्या निवडणुकीत देशात वेगळं चित्र निर्माण झालं आहे. आज पंतप्रधान जिल्ह्यात आहेत, अमित शाह भाषण करतात आणि विचारतात शरद पवारांनी काय केलं? राज्याचे गृहमंत्री लोकांच्यात जाऊन आपण काय केलं हे सांगत नाहीत, दुसऱ्यांनी काय केलं हे विचारतात', असं शरद पवार म्हणाले.
'देवेंद्र फडणवीस म्हणाले दोन पक्ष फोडून मी या ठिकाणी आलो, पक्ष उभे करायला अक्कल लागते, फोडायला अक्कल लागत नाही. चव्हाण साहेबांना भारतरत्न करण्याचं बोललं जात आहे. 10 वर्षात सुचलं नाही, निवडणूक आल्यावर सुचलं. आज कराडला आहेत, त्यांनी आजच जाहीर करून टाकावं, यशवंतराव चव्हाणांना भारतरत्न देतो म्हणून', असं आव्हान शरद पवारांनी केलं आहे.
'गुजरातमध्ये मोदी मुख्यमंत्री असताना एका भगिनीच्या घरावर हल्ला झाला. अत्याचार केले गेले, त्यांच्या सासऱ्यांची हत्या केली. यात ज्यांना 11 वर्षांची शिक्षा झाली, मात्र मोदी सत्तेवर आल्यानंतर त्यांची सुटका केली आणि गळ्यात हार घालून सन्मान केला. स्त्रीयांची अब्रू घेणाऱ्यांचा सन्मान करण्याचं धोरण जे स्वीकारतात ते देशाचे हितचिंतक असू शकत नाहीत, त्यांना मत मागायचा अधिकार नाही', अशी टीका शरद पवारांनी केली आहे.
'हे भ्रष्टाचार घालवू म्हणतात, मात्र भ्रष्टाचार घालवायचा ज्यांनी प्रयत्न केला, त्यांच्यावर कारवाई केली गेली. सत्तेचा गैरवापर कसा करतात याची उदाहरणं त्यांनी दिली. तुमच्याकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या का? याचा अर्थ आम्ही म्हणू ते राजकारण, आम्ही म्हणू ते धोरण असं सुरू आहे, जे देशाच्या हिताचं नाही. अरविंद केजरीवालांनी मोदींवर टीका केली, म्हणून आज ते तुरुंगात आहेत. देशाच्या राजधानीचे मुख्यमंत्री तुरुंगात आहेत,' असा आरोप शरद पवारांनी केला.