मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवास्थानी आज शनिवारी दुपारी गणपती बाप्पाचे आगमन झाले. यावेळी संपूर्ण शिंदे कुटुंबीय उपस्थित होते. गणरायाची आरती केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. दरम्यान राज्यातील काही भागात अतिवृष्टी झाल्याने खरीप हंगामातील पिकांचं मोठं नुकसान झालंय. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मदतीचा शब्द दिला आहे. काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे शेतीभातीचं नुकसान झालं आहे. पण सरकार पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. सगळी मदत केली जाईल, असं मुख्यमंत्री शिंदेंनी म्हटलंय.
काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे?
राज्यातल्या सर्व नागरिकांना आणि गणेशभक्तांना मी गणेशोसत्वानिमित्त शुभेच्छा देतो. गणरायाचं आगमन झालंय. आपल्या आयुष्यात पण आनंद, समाधान, समृद्धी येवो. सर्वांना सुबुद्धी मिळो हीच प्रार्थना. गणेशोत्सव काळात महाराष्ट्राच्याच नाही तर देशात आणि विदेशातही मराठी माणसांत उत्साह-जोश दिसतो, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
यंदा राज्यात ससगळीकडे खूप चांगला पाऊसही झाला आहे, त्यामुळं शेतकरी बांधवामध्येही उत्साह आहे. काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे शेतीभातीचं नुकसान झालं आहे. पण सरकार पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी असून त्यांना सगळी मदत केली जाईल, असा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला.
परदेशी गुंतवणूक राज्यात मोठ्या प्रमाणावर येत आहे. देशाच्या पाच ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेत महाराष्ट्राचा एक ट्रिलियन डॉलर्सचा वाटा असणार आहे. गणेशाच्या कृपेनं आम्ही राज्यातल्या गोरगरीब, दुर्बल आणि गरजू लोकांसाठी आणखीही चांगल्या योजना आणून त्यांची अंमलबजावणी करू, असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.