राज्यात सध्या विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारणात मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. याच दरम्यान आता मात्र महाविकास आघाडीमधून एक अत्यंत मोठी बातमी समोर येत आहे. या बातमीनुसार मविआत मोठा भूकंप येणार असल्याचं चिन्ह दिसतंय.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी महाविकास आघाडीच्या काही उमेदवारांनी ऐनवेळी निवडणुकीतून माघार घेतली, त्याचा मोठा फटका महाविकास आघाडीला बसला आहे. दरम्यान ज्या -ज्या उमेदवारांनी अशाप्रकारे निवडणुकीतून माघार घेतली, त्यांच्यावर महाविकास आघाडीतील घटक पक्षांकडून कारवाई करण्यात आली आहे, त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.
दरम्यान पुणे विधान परिषद निवडणुकीतून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार श्रीकांत पाटील यांनी माघार घेतल्यामुळे महाविकास आघाडीमध्ये आता नाराजीनाट्य सुरू झालं आहे. पुणे विधान परिषदेमधून राष्ट्रवादी शरद पवार गटाने माघार घेतल्यानंतर काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट नाराज झाला आहे. पुण्यात मविआतून बाहेर पडण्याचा वरिष्ठांकडे प्रस्ताव दिल्याची माहिती काँग्रेसच्या वतीने देण्यात आली आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये शिवसेना ठाकरे गटाचं नुकसान झाल्याचं शिवसेना ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांनी म्हटलं आहे.