राज्यात अजूनही पावसाने हजेरी लावली नसल्याने राज्यात चिंतेचे सावट निर्माण जाहले आहे . याचदरम्यान आता एका शहरासाठी एक चिंतेची बाब समोर आली आहे. एकीकडे असह्य उकाडा, घामाचे प्रमाण आणि वाढत्या तापमानामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत, तर दुसरीकडे पाणीटंचाईचे संकट अधिक गंभीर होत चालले आहे.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमध्ये सध्या केवळ 10 टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने पुढील आठवड्यापासून पाणीकपात वाढवण्याचा विचार सुरू केला आहे.
सध्या शहरात 10 टक्के पाणीकपात लागू असून, परिस्थिती सुधारली नाही तर ती वाढवून 20 टक्क्यांपर्यंत करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. लांबलेल्या पावसामुळे जलसाठ्यावर गंभीर परिणाम झाला असून भविष्यात पाणीपुरवठ्यावर मोठा ताण येण्याची शक्यता आहे.
भारतीय हवामान विभागाकडूनही मान्सून आणखी लांबण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे परिस्थिती अधिक गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, पिण्याच्या पाण्याचा गैरवापर टाळण्यासाठी महापालिकेने कडक इशारा दिला आहे. बांधकामे, स्विमिंग पूल, क्लब आणि वाहन धुण्यासाठी पाण्याचा वापर झाल्यास कठोर कारवाई करण्यात येईल असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर पुढील आठवड्यात पाणीपुरवठा नियोजनाबाबत महत्त्वाची बैठक होणार असून, त्यानंतर पाणीकपातीबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. मुंबईकरांचे लक्ष आता पालिकेच्या पुढील निर्णयाकडे लागले आहे.