गेल्या अनेक दिवसांपासून देशभरात अनेक भीषण आणि दुर्दैवी घटना घडत आहेत. दरम्यान आता मध्य प्रदेशातील आगर-माळवा जिल्ह्यातील नलखेडा येथून एक भीषण दुर्घटना समोर आली आहे.
समोर आलेल्या ,माहिती नुसार, मध्य प्रदेशातील आगर-माळवा जिल्ह्यातील नलखेडा येथील प्रसिद्ध मा बगलामुखी मंदिराजवळ मुसळधार पावसादरम्यान भीषण दुर्घटना घडली. पावसामुळे नाल्याला आलेल्या जोरदार पाण्याच्या प्रवाहातून भाविकांना घेऊन जाणारी कार वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली. या दुर्घटनेत कारमधील 8 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मृतांमध्ये 3 मुले, 3 पुरुष आणि 2 महिलांचा समावेश आहे.
नलखेडा परिसरात रात्रीच्या वेळी मुसळधार पाऊस सुरू होता. याच दरम्यान मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर असलेल्या नाल्यात पाण्याचा प्रवाह अचानक वाढला. भाविकांनी भरलेली कार या जोरदार प्रवाहाच्या तडाख्यात सापडली आणि वाहून गेली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिस आणि प्रशासनाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर कार आणि त्यातील प्रवाशांचा शोध घेण्यासाठी तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले.
कार वाहून गेल्याची माहिती मिळताच प्रशासन आणि बचाव पथकाने युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू केली. घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. पोलिसांनी गर्दीवर नियंत्रण मिळवत बचावकार्य सुरू केले. बचाव पथकाने नाल्यातून कार बाहेर काढण्याची तसेच कारमधील मृतदेह कारवाई केली. या दुर्घटनेमागील नेमकी कारणे आणि परिस्थितीचा तपास पोलीस करत आहेत. दरम्यान, या दुर्घटनेनंतर नलखेड्यात नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण पाहायला मिळाले. घटनास्थळी आगर-माळवा जिल्ह्याचे कलेक्टर आणि एसपी दाखल झाले असता संतप्त नागरिकांनी त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली.
मिळालेल्या माहितीनुसार, कारमधील प्रवासी आगर-माळवा जिल्ह्यातील नलखेडा येथील प्रसिद्ध माँ बगलामुखी मंदिरात दर्शनासाठी आले होते. लखुंदर नदीच्या काठावर असलेले हे मंदिर प्रसिद्ध धार्मिक स्थळ असून, देशभरातून मोठ्या संख्येने भाविक येथे दर्शनासाठी येतात.