भारतीय क्रिकेटमध्ये निवड समितीच्या पातळीवर मोठा बदल होण्याची शक्यता आहे. टीम इंडियाचे मुख्य निवडकर्ता अजीत आगरकर यांचा कार्यकाळ संपण्याच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयकडून लवकरच महत्त्वाचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. आगरकर यांना मुदतवाढ मिळणार की नव्या चेहऱ्याकडे मुख्य निवडकर्त्याची जबाबदारी सोपवली जाणार, याकडे क्रिकेटविश्वाचे लक्ष लागले आहे. दरम्यान, नव्या चीफ सिलेक्टर पदासाठी दोन माजी भारतीय क्रिकेटपटूंची नावं चर्चेत आली आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआय आगरकर यांचा करार पुढे वाढवण्याच्या विचारात नाही. काही दिवसांपूर्वीपर्यंत आगरकर यांचा कार्यकाळ 2027 च्या वनडे वर्ल्ड कपपर्यंत वाढवला जाऊ शकतो, अशी चर्चा होती. मात्र आता बीसीसीआयच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
वेस्टइंडिजविरुद्ध होणाऱ्या आगामी वनडे आणि टी-20 सिरीजसाठी टीमची निवड आगरकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली आहे. हीच त्यांच्या कार्यकाळातील शेवटची सिलेक्शन मीटिंग ठरू शकते, अशी चर्चा सुरू आहे.
भारताला 22 ऑक्टोबरपासून न्यूझीलंडविरुद्ध सिरीज खेळायची आहे. या दौऱ्यात भारत आणि न्यूझीलंडमध्ये 5 टी-20, 3 वनडे आणि 2 टेस्ट सामने होणार आहेत. या सिरीजपूर्वी टीम इंडियाला नवा चीफ सिलेक्टर मिळण्याची शक्यता आहे.
एका वृत्तानुसार , बीसीसीआयच्या सूत्रांनी चीफ सिलेक्टर पदासाठी दोन नावं पुढे असल्याचं सांगितलं आहे. भारताचे माजी क्रिकेटपटू पार्थिव पटेल आणि प्रज्ञान ओझा हे अजीत आगरकर यांच्या जागी येण्यासाठी आघाडीवर असल्याचं सांगितलं जात आहे. प्रज्ञान ओझा सध्या अजीत आगरकर यांच्या नेतृत्वाखालील सिलेक्शन कमिटीचा भाग आहेत. त्यामुळे या पदासाठी त्यांचं नाव महत्त्वाचं मानलं जातंय.
आगरकर यांचा करार संपणार सिलेक्शन कमिटीचे चेअरमन म्हणून अजीत आगरकर यांचा करार या महिन्यात संपत आहे. याआधी त्यांचा करार पुढील वर्षी होणाऱ्या वनडे वर्ल्ड कपपर्यंत वाढवला जाऊ शकतो, अशी चर्चा होती. मात्र बीसीसीआयमधील काही जण आगरकर यांचा कार्यकाळ आता जवळपास संपला असल्याचं मानत असल्याचं सूत्रांनी सांगितलंय. गेल्या काही दिवसांपासून आगरकर यांना कराराची मुदतवाढ मिळणार की नाही, याबाबत चर्चा सुरू आहे. BCCI च्या AGM मुळे चर्चेला वेग बीसीसीआयची वार्षिक सर्वसाधारण सभा म्हणजेच AGM शुक्रवारी होणार आहे.
त्यामुळे आगरकर यांना कराराची मुदतवाढ मिळण्याची शक्यता कमी असल्याचं बोललं जातंय. सूत्रांच्या माहितीनुसार बुधवारी झालेल्या शेवटच्या सिलेक्शन मीटिंगचे अध्यक्षपद आगरकर यांनी भूषवलं. त्यानंतर बीसीसीआयने वेस्टइंडिजविरुद्धच्या आगामी व्हाइट-बॉल सिरीजसाठी भारताचा संघ जाहीर केला. याशिवाय ईराणी ट्रॉफीसाठीही टीमची घोषणा करण्यात आली. ईराणी ट्रॉफीसाठी निवडल्या जाणाऱ्या रेस्ट ऑफ इंडिया (ROI) संघाच्या सिलेक्शन पॅनेलचे प्रमुखही अजीत आगरकर आहेत.
पार्थिव आणि प्रज्ञान दोघेही IPL विजेते अजीत आगरकर यांच्या जागी बीसीसीआयच्या सिलेक्शन कमिटीचे चेअरमन म्हणून माजी विकेटकीपर पार्थिव पटेल आणि माजी फिरकी गोलंदाज प्रज्ञान ओझा यांच्या नावांची चर्चा आहे. विशेष म्हणजे पार्थिव पटेल आणि प्रज्ञान ओझा या दोघांनीही आयपीएलमध्ये तीन वेळा विजेतेपद मिळवलं आहे. आता बीसीसीआय चीफ सिलेक्टर पदासाठी कोणाची निवड करणार, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.