अजित पवारांच्या सख्ख्या भावाने सोडली त्यांची साथ म्हणाले, “प्रत्येक नात्याची एक्स्पायरी डेट......”
अजित पवारांच्या सख्ख्या भावाने सोडली त्यांची साथ म्हणाले, “प्रत्येक नात्याची एक्स्पायरी डेट......”
img
Dipali Ghadwaje
बारामती : अजित पवारांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यावर त्यांना पवार कुटुंबातूनच विरोध होतांना पाहायला मिळाला होता. विशेष म्हणजे आयुष्याच्या प्रत्येक वळणावर अजित पवारांनी ज्या व्यक्तीकडून सल्ले घेतले त्या श्रीनिवास पवारांनी देखील अजित पवारांची साथ सोडली असल्याचे पाहायला मिळत आहे. 

बारामतीमधील काटेवाडी येथील गावकऱ्यांशी श्रीनिवास पवार यांनी संवाद साधतांना त्यांनी अजित पवारांचा निर्णय पटला नसल्याचे बोलून दाखवले. भाऊ म्हणून तुझं सगळं ऐकलं, पण आता नाही असे म्हणत अजित पवारांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांनी त्यांची साथ सोडली आहे. 

दरम्यान यावेळी बोलतांना श्रीनिवास पवार म्हणाले की, "तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल की मी दादांच्या विरोधात कसा?, मी नेहमी त्याला साथ दिली. भाऊ म्हणून तो म्हणेल तशी मी उडी मारली. दादांची माझी चर्चा झाली, त्यावेळेस मी त्याला म्हटलं आमदारकीला तू आहेस, तर खासदारकी साहेबांना दिली पाहिजे. कारण साहेबांचे आमच्या वरती उपकार आहेत हे तुम्हाला सगळ्यांना माहित आहेत.

जगायचं तर स्वाभिमानाने
जमीन आपल्या नावावर केली म्हणून त्यांना घराबाहेर काढायचं नाही. ज्यांना कुणाला काही पद मिळाली ती साहेबांमुळे मिळाले.  साहेबांना म्हणायचे कीर्तन करा, घरी बसा हे काय मला पटलं नाही. मी वेगळा माणूस आहे. माझ्या शाळेतील मित्र मला न सांगता गेले (भरणेंना टोला), औषध विकत आणतो त्याला एक्सपायरी डेट असते. तशी नात्यांची देखील एक्सपायरी डेट असते. वाईट वाटून घ्यायचं नाही. मला दबून जगायचं नाही, जगायचं तर स्वाभिमानाने.  जे लाभार्थी आहेत त्यांच्यामागे जायचं मला वाटत नाही, असे श्रीनिवास पवार म्हणाले. 

भाजपला शरद पवार संपवायचे होते.
साहेबांनी काय केलं हा प्रश्न विचारला, ज्या साहेबांनी आपल्याला चार वेळा उपमुख्यमंत्री केले. 25वर्ष मंत्री केलं. मला जर असा काका मिळाला असता तर मी खूष झालो असतो. ही सगळी चाल भाजपची आहे. भाजपला शरद पवार संपवायचे होते. घरातले व्यक्ती जर बाहेर पडला तर आपण घर फोडू शकतो. घरातला माणूस घरच्याला माहीत नाही. साहेबांना एकुलती एक मुलगी आहे. मला हे अजिबात पटलं नाही. साहेब जर दहा वर्ष जुने असते तर कळलं असतं, साहेबांनी काय केलं असतं. वय वाढलं म्हणून वयस्कर माणसाला तुम्ही कमजोर समजू नका. माझ्या वयाची माणसं लाभार्थी आहेत, तरुण पिढी म्हणते पुढचं पुढे बघू. साहेब कधी कुणाला आवाज चढवून बोलले का?, वीस पंचवीस वर्ष साहेबांनी राज्य सोपवलं होतं आणि ते दिल्लीत होते. मी माझा कारखाना माझ्या मुलाकडे सोपवला आहे. वीस वर्षांनी जर मी तिकडे गेलो तर वॉचमनच मला सोडत नाही. आपण खेडेगावातली माणसं  आहोत, आपण मरेपर्यंत आई-वडिलांना सांभाळतो त्यांचा औषध पाणी करतो, असे श्रीनिवास पवार म्हणाले. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group