नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- नाशिक लोकसभा मतदारसंघात निवडणूक शांततेत पार पडावी या दृष्टीने परिमंडळ-1 चे उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांनी अभिनव उपक्रम सुरू केला आहे. तो म्हणजे काही संवेदनशील प्रकरणांतील सराईत गुन्हेगारांच्या मित्रांनाही त्यांच्यावर गुन्हा दाखल नसला, तरीही तडीपार करण्यात आले आहे.
दरम्यान, परिमंडळ-1 मध्ये जानेवारी 2024 पासून आतापर्यंत तडीपारीचे अर्धशतक गाठले असून, 52 हून अधिक गुन्हेगारांना जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. त्यामध्ये गुन्हेगारांसह गोमांस विक्रेते आणि सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्यांचाही समावेश आहे.
उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार जानेवारी 2024 मध्ये म्हसरूळ परिसरात गुन्हेगारांसोबतच्या झटापटीत एका निवृत्त लष्करी जवानाचा मृत्यू झाला होता. यामध्ये तीन जणांना अटक करण्यात आली, तसेच या घटनेत आणखी सहा जण गुन्हेगारांसोबत मद्यपान करण्यासाठी जमले होते. असे निष्पन्न होताच मित्रांवर कोणताही गुन्हा दाखल नसला, तरीही गुन्हेगारांसोबतचे मित्र म्हणून या सहा जणांनाही हद्दपार करण्यात आले आहे.