40 हजारांची लाच घेताना कालवा निरीक्षकास वडाळा उपविभाग अंतर्गत नॉर्दन ब्रांच, सिंचन शाखा, श्रीरामपूर, जि. अहमदनगर येथील कालवा निरीक्षकासह तिघांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे.
अंकुश सुभाष कडलग (वय ४२, रा. बटवाल मळा, सावित्रीबाई फुले नगर, ढोलेवाडी- गुंजाळवाडी, संगमनेर, ता.संगमनेर, जि.अहमदनगर), अनिस सुलेमान शेख (वय ३४, रा. निमगाव खैरी, ता. श्रीरामपूर, जि. अहमदनगर) व संजय भगवान करडे (वय ३८, रा. मोरगे वस्ती, ता. श्रीरामपूर, जि.अहमदनगर) असे अटक केलेल्या तिघांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांच्या सुनेच्या नावे महाराष्ट्र शेती विकास महामंडळ यांच्या मालकीचे हरेगाव मळा येथील गट नंबर ३ मधील ३१९ एकर शेती दहा वर्षाच्या करार पद्धतीने कसण्यास घेतलेली आहे. तक्रारदार यांनी या क्षेत्रापैकी सध्या 60 एकर ऊस लागवड केली होती.
या शेतीस पाटबंधारे विभागाचे आवर्तनाद्वारे पाणी मिळते. त्यास दर तीन महिन्यांनी पाटबंधारे विभागाकडे पाणीपट्टी भरावी लागते. तक्रारदार यांना जानेवारी 2023 ते मार्च 2023 या कालावधीत 26,280 रुपये पाणीपट्टी आली होती. ही पाणीपट्टी तक्रारदार हे शेती महामंडळाचे हरेगाव येथील कार्यालयात भरतात. महामंडळातर्फे ही पाणीपट्टी पाटबंधारे विभागास वर्ग केली जाते. तक्रारदार यांचे ६० एकर उसाचे क्षेत्र आहे पैकी 35 एकर क्षेत्रासाठी शेतात असलेल्या विहीर व बोअरद्वारे सिंचन करतात उर्वरित 25 एकर साठी पाटबंधारे विभागाकडून कालव्याचे पाणी घेतात.
यातील आरोपी अंकुश कडलग यांनी तक्रारदार यांना त्यांचे शेती सिंचनाचे क्षेत्र जास्त असल्याचे सांगून पाटबंधारे विभागामार्फत देण्यात येणारे पाणी अविरत चालू राहू देण्यासाठी एकूण ८५,००० रुपये लाचेची मागणी केली. याबाबत तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. त्यानुसार लाच मागणी पडताळणी करण्यात आली. लाच मागणी पडताळणी दरम्यान अंकुश कडलग यांनी अनिस शेख याचे मार्फत तक्रारदाराकडे ८५,००० रुपये लाचेची मागणी केली. तडजोडी अंती ४०,००० लाचेची मागणी केली व फोनवरील संभाषणाद्वारे दुजोरा दिला.
आज (दि. २५) अंकुश कडलग याने तक्रारदार यांच्याकडून ४०,००० रुपये लाच रक्कम स्वीकारून ही रक्कम संजय करडे याच्याकडे हस्तांतरित केली. तिन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आलेले आहे. या बाबत श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन, जि.अहमदनगर येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.