नागपूर जिल्ह्यातील भिवापूर येथे लग्नाच्या जेवणातून विषबाधेची घटना घडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
लग्नात जेवण केल्यानंतर तब्बल शंभरहून अधिक नातेवाईकांना उलट्या, जुलाब आणि तापाचा त्रास जाणवू लागला होता.
यानंतर तत्काळ उपचारासाठी रुग्णांना उमरेड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या 32 रुग्णांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. यापैकी तीन गंभीर रुग्णांना पुढील उपचारासाठी नागपूरला हलवण्यात आलं आहे.
नागपुरातील भिवापूर येथे विवाह सोहळ्यात हा प्रकार घडला. वऱ्हाडी आणि वधुपक्षातील अनेकांनी जेवण केल्यानंतर त्यांनी त्रास होत असल्याची तक्रार केली. संदिग्ध अन्नपदार्थ आणि पाण्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. अन्न व औषध प्रशासन आणि आरोग्य विभागाने या घटनेचा तपास सुरू केला आहे.
लग्नात दिलेल्या दहीवडा आणि गुलाबजामुनमुळे विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. अद्याप विषबाधेचं नेमकं कारण समोर आलेलं नाही. तरी याबाबत तपास सुरू आहे.